श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur
राज्य, केंद्र सरकारच्या विविध कर्जमाफी योजनेत अपात्र असलेल्या सेवा सहकारी संस्थेतील थकबाकीदार शेतकर्यांना नव्याने पिक कर्ज देण्याची मागणी श्रीरामपूर तालुका शेतकरी संघटनेचे अनिलराव औताडे यांनी अहमदनगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापन समितीसह जिल्हा उपनिबंधकांना निवेदनाद्वारे केली आहे.
मागील गेल्या 40 वर्षापासून राज्य व केंद्र सरकारने वेळोवेळी शेतकर्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने प्रथमत: माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्यासह केंद्रातील माजी पंतप्रधान व्ही.पी.सिंग व मनमोहन सिंग सरकारने निकष-अटी व शर्ती लादून कर्जमाफी देण्याचा प्रयत्न केला.
परंतू तारखेच्या रक्कमेच्या व क्षेत्राच्या अटीमुळे 1990 पासून सदर योजनेचा लाभ 25 ते 50 % शेतकर्यांना सातत्याने झालेला नाही. चुकीच्या बाबी बरोबरच वेळोवेळी राबविलेल्या कर्ज माफी योजनेत अपात्र ठरलेल्या व सेवा सोसायटीच्या कर्ज घेतलेल्या शेतकर्यांना पिक कर्ज गेल्या 25 वर्षापासून मिळत नाही.
तरी जिल्हा बँक व्यवस्थापन समितीने वेळोवेळी शेतकरी हिताचे निर्णय घेऊन आजपर्यंत जिल्ह्यातील शेतकर्यांना दिलासा देण्याचे प्रयत्न केले आहे त्याप्रमाणे विविध कर्जमाफी योजनेत अपात्र ठरलेल्या सेवा सोसायटी थकबाकीदार शेतकर्यांना एक रक्कमी कर्ज परतफेड योजना रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे राबविण्याची अंमलबजावणी करुन नव्याने पिक कर्ज मिळावे.