
पाचेगाव |वार्ताहर| Pachegav
अहमदनगर जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील पावसाचे प्रमाण मागील आठवड्यात घटल्याने विसर्ग कमी करण्यात आला होता, पण आता पावसाने सगळीकडे हजरी लावल्याने मुळा व प्रवरा नदीपात्रातील पाणी पातळी पुन्हा वाढवली होती.त्यामुळे पाचेगाव येथील प्रवरा व मुळा नदी दुथडी वाहू लागली.
दोन्ही धरणातून गेल्या दीड महिन्यापासून नदीपात्रात मोठ्याप्रमाणात विसर्ग सोडण्यात येत होता. गेल्या सप्ताहात पाणलोटात पाऊस ओसारल्याने धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग कमी करण्यात आल्याने गोदावरी आणि प्रवरा नदीपात्रातील पाणीपातळीत कमालीची घट झाली होती. पण पुन्हा पावसाने वरील धरणावर हजेरी लावल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले. त्यात मुळा धरणात सुरुवातीला दहा हजार, पंधरा हजार व नंतर गुरुवारी सायंकाळी पंचवीस हजार क्युसेसने विसर्ग सोडण्यात आला. पण शुक्रवारी सायंकाळी परंत विसर्ग कमी करून दहा हजार क्युसेसने विसर्ग सुरू ठेवण्यात आला.
हवामान खात्याने आगामी काळात पावसाचा जोर वाढण्याचे संकेत दिलेले आहे. परतीच्या मान्सूनला अजून सुरुवात झालेली नाही. सुरू असणारा सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पावसाचा जोर राहिल्यास गोदावरी आणि प्रवरेतून जायकवाडीकडे झेपावणार्या पाण्याचा 100 टीएमसीचा आकडा जवळपास पार होण्याची शक्यता वर्तवली जात असून भविष्यात पाणी वाटप समान कायदा अंतर्गत वरील धरणातून पाणी सोडण्याची आवश्यकता नसल्याने वरील धरणातला पाणीसाठा आपल्या जिल्ह्यात वापरण्यात येणार असल्याने भविष्यातील पिण्याचे पाणी व शेती आवर्तने वेळेवर मिळणार असल्याची खात्री असल्याने भविष्यात होणारी पाणीटंचाई आजच्या पाण्यावरून तरी मिटली आहे. भविष्यात आपल्याला हक्काचे शेती व पिण्याचे आवर्तन वेळेवर मिळणार असल्याने लाभधारक शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.