राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी शहरहद्दीत घराचे बांधकाम सुरू असताना जागेच्या मालकी हक्कावरून वाद घालत तिघां जणांनी मिळून दुसर्या तिघां जणांना विट व खोर्याच्या दांड्याने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच दरवाजा तोडून नुकसान केले. ही घटना दि. 12 जून रोजी घडली.
राहुरी शहरहद्दीतील लोहार गल्ली येथे राहणारे दत्तात्रय शिवराम रणसिंग यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, फिर्यादी दत्तात्रय रणसिंग व आरोपी हे शेजारी शेजारी राहण्यास आहेत. रणसिंग यांना राहुरी नगरपरिषदेकडून घरकुल मंजूर झाले आहे. दि. 12 जून रोजी दुपारी त्या घराचे बांधकाम सुरू असताना आरोपी तेथे आले व फिर्यादीस म्हणाले, ही जागा माझी आहे. तू येथे बांधकाम करायचे नाही.
त्यावेळी फिर्यादी रणसिंग म्हणाले, मला घरकुल मंजूर झाले आहे. ही जागा माझी आहे. असे म्हणून समजावून सांगत होते. याचा त्याला राग आल्याने त्याने रणसिंग यांचा मुलगा संकेत याला वीट मारली. यावेळी त्यांची मुलगी आरती व पत्नी सुरेखा या भांडणे सोडविण्यासाठी आल्या. तेव्हा त्यांना आरोपींनी खोर्याच्या दांड्याने मारहाण करून दुखापत केली. तसेच रणसिंग यांची पत्नी सुरेखा यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचबरोबर घराचे दार तोडून नुकसान केले.
रणसिंग यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत कैलास सदाशिव रणसिंग, वर्षा कैलास रणसिंग, मंदा सदाशिव रणसिंग सर्व रा. लोहार गल्ली राहुरी या तिघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक मनोज राजपूत हे करीत आहेत.