अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्हा परिषदेची 14 जूनला होणारी ऑनलाईन सर्वसाधारण सभा गाजणार असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद पदाधिकारी आणि प्रशासन यांनीही सभा ऑनलाइन पद्धतीने ठेवल्यामुळे सत्ताधार्यांसह विरोधी गटातील सदस्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सत्ताधारी विरोधात विरोधक असा ‘आपट बार’ पुन्हा फुटणार आहे.
जिल्हा परिषद अधिनियमनुसार दर तीन महिन्यांनी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक आहे. या नियमानुसार येत्या 24 जूनला मागील सर्वसाधारण सभेचा तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होणार आहे. तर दुसरीकडे नगरसह राज्यातील करोना संसर्गाच्या स्थिती सुधारत असल्याने लॉकडाऊनमध्ये शिथीलता येण्याची अथवा सवलत मिळण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा 14 जून ऐवजी 15 ते 24 जूनच्या दरम्यान कधीही व्हावी, अशी काही सदस्यांची मागणी आहे. मात्र, सत्ताधारी पदाधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने ही सर्वसाधारण सभा प्रत्यक्षात घेता येणे शक्य असतांनाही विरोधी सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यास सत्ताधारी आणि प्रशासन तयार नसल्याने ऑनलाईन सभेची पळवाट काढण्यात आल्याचा आक्षेप विरोध सदस्यांमधून होत आहे.
करोनासंसर्गामुळे दोन वर्षापासून जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा प्रत्यक्षात सदस्यांच्या उपस्थितीत झालेली नाही. सर्व सभा या पंचायत समिती पातळीवरून सदस्य ऑनलाईन सभेत सहभागी होत आहेत. यात अनेक सदस्यांना चर्चेत सहभागी होणे सोडा साधे प्रश्नही मांडण्याची संधी मिळतांना दिसत नाही. यामुळेच सदस्यांची सभागृहातील प्रत्यक्षातील सभेसाठी आग्रह आहे. मात्र, सत्ताधारी आणि प्रशासन विरोधकांच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी जाणीवपूर्वक सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेत असल्याचा आरोप काही सदस्यांकडून होतांना दिसत आहे. यामुळे येत्या काही दिवसांत जिल्हा परिषदेच्या वातावरणात पुन्हा उष्ण वारे वाहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रत्यक्षात होणारी सभा घेण्याची मागणी विरोधी सदस्यांसह काही सत्ताधारी पक्षातील सदस्यांकडून होतांना दिसत आहे.
जिल्ह्यात पालकमंत्री यांच्या उपस्थितीत महसूल विभागासह अन्य विभागाच्या अधिकारी, तसेच लोकप्रतिनिधींच्या बैठका होवून शकतात. मात्र, ग्रामीण भागाच्या विकासाचा केंद्रबिंदू असणाार्या जिल्हा परिषद सदस्यांची सर्वसाधारण सभा करोना नियम पाळून प्रत्यक्षात सभागृहात होवू शकत नाही, असा संतप्त भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी व्यक्त केला आहे.