कांद्याचे पांढरी सड या रोगापासून संरक्षण - दवंगे

शेतकर्‍यांनी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना
कांद्याचे पांढरी सड या रोगापासून संरक्षण - दवंगे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

कांद्याच्या या पांढर्‍या सड रोगांवर प्रतिबंध होण्याच्या दृष्टीने वेळीच उपाययोजना होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास

कांद्याचे पांढरी सड या रोगापासून संरक्षण होऊन मोठे नुकसान टळेल, असे भारत दवंगे यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासन कृषि विभाग व आत्मा सन 2020-21 मध्ये क्षेत्रीय किसान गोष्टी अंतर्गत कांदा पिकाचे एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला.

दवंगे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, सध्या बहुतांश क्षेत्रावर कांदा पिकामध्ये पांढरी सड या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. लागवड केल्यानंतर काही दिवसांमध्येच कांद्याचे रोप मुळापासून सडून जात आहे. कांद्यामध्ये दिसून येत असलेला हा पांढरी सड नावाचा रोग असून जमिनीमधील हानीकारक बुरशीमुळे या रोगाचे कांद्याच्या मुळांना सुरूवातीला लागण होते.

आणि नंतर कांद्याच्या वाढणार्‍या कांद्यामध्ये ही बुरशी शिरते आणि संपूर्ण मुळे आणि कंद सडून जाऊन रोप सहजासहजी उपटून येते. या रोगाच्या सुरुवातीला कांद्याची पात पिवळसर पडून जमिनीवर पडते आणि वाळून जाते ज्या जमिनीमध्ये जास्त दिवस ओलावा टिकून राहील, अशा जमिनीमध्ये ही हानीकारक बुरशी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे निदर्शनास आले आहे.

कांद्याच्या या पांढर्‍या सड रोगांवर प्रतिबंध होण्याच्या दृष्टीने वेळीच उपाययोजना होण्यासाठी श्री.दवंगे यांनी सांगितले की, कांद्याची पुनर्लागवड करण्याच्या वेळी कांद्याचे रोप हे 0.2 टक्के कार्बेन्डॅझीम या बुरशीनाशकाच्या द्रावणात 10 मिनिटे बुडविल्यानंतर लागवड करावी.

याशिवाय लागवडीपूर्वी जमिनीमध्ये मेटॅलिक्झील 4 टक्के + 64 टक्के डब्ल्यू डब्ल्यु पी किंवा कार्बेन्डॅझीम 12 टक्के + मेंकोक्केब 63 टक्के डब्ल्यू पी किंवा पायरॅक्लोस्टोबीन 5 टक्के + मेटीराम 55 टक्के डब्ल्यू जी यापैकी एका बुरशीनाशकांचा रासायनिक खताबरोबर प्रति एकरी एक किलो या प्रमाणात वापर करावा अगर यापैकी एखाद्या बुरशीनाशकांचा एक किलो प्रतिएकर 300 लिटर पाण्यात मिसळून ड्रेंचींगव्दारे देखील वापर वापर करता येईल.

त्याचबरोबर कांदा पिकामध्ये अन्नद्रव्यांचा वापर करताना प्रति एकरी 20 किलो दाणेदार गंधक वापरावे तसेच पॉटेश या अन्नद्रव्याची मात्रा एकरी 15 किलो या प्रमाणात वाढवून द्यावी असेही त्यांनी सांगितले यावेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास कांद्याचे पांढरी सड या रोगापासून संरक्षण होऊन मोठे नुकसान टळेल असे दवंगे यांनी सांगितले.

सदर कार्यक्रम अशोक साळी (ता. कृ. अ. श्रीरामपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी श्रीमती आश्विनी गोडसे (म. कृ. अ.), श्रीमती बी. एन. दहीमिवाळ (कृ.स.), श्रीमती एम. एम. बढे (बीटीएम श्रीरामपूर), ए. डी. मानकर (एटीएम श्रीरामपूर), व कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com