अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जुनी पेन्शन (Old Pension) व जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर महापालिका नगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायत कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने मंगळवार (दि.14 मार्च) पासून बेमुदत संप (Indefinite Strike) पुकारुन जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात (Movement) सर्व सरकारी, निमसरकारी व कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
एकच मिशन जुनी पेन्शन..., कर्मचारी एकजुटीचा विजयाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. आंदोलकांच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय (Collector Office) परिसर दणाणून निघाला. परिसरातील संपूर्ण रस्ते आंदोलकांच्या गर्दीने व्यापले होते. तर महिला पुरुष आंदोलकांनी जुनी पेन्शन मागणीचे मजकुर लिहिलेले गांधी टोप्या परिधान केल्या होत्या.
यावेळी समन्वय समितीचे निमंत्रक रावसाहेब निमसे, सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, पी.डी. कोळपकर, विलास पेद्राम, आप्पासाहेब शिंदे, प्रा. सुनिल पंडित, महेंद्र हिंगे, पुरुषोत्तम आडेप, भाऊसाहेब डमाळे, विजय काकडे, बाळासाहेब वैद्य, बाळासाहेब साखरे, रवी डिक्रुज, कैलास साळुंके, सुरेखा आंधळे, नलिनी पाटील, युवराज म्हस्के, भाऊसाहेब शिंदे आदींसह सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, मुख्याध्यापक, माध्यमिक शिक्षक, जिल्हा परिषद व त्यांच्या संलग्न सर्व संघटना, महानगरपालिका, पंचायत कर्मचारी, जुनी पेन्शन हक्क संघटना आदी सर्व संघटनाचे प्रतिनिधी व सदस्य उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत समिती मधील कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. याबाबत मध्यवर्ती संघटना व इतर संघटनांच्या मार्फत शासनाकडे वेळोवेळी चर्चा व निवेदने सादर करून शासनाने सदर प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु या मागण्यांना आजपर्यंत सकारात्मक प्रतिसाद शासनाने दिलेला नाही. सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा, सर्व कंत्राटी कर्मचार्यांच्या सेवा नियमित करा, सर्व रिक्त पदे अग्रक्रमाने भरा, चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांची पदे निरसित करू नका, शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्यावा आदी मागण्यांसाठी बेमुदत संपाला सुरुवात झाली आहे.
रावसाहेब निमसे म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत जुनी पेन्शन मिळाल्याशिवाय माघार नाही. शासनाने जास्त वेळ सरकारी कर्मचारी, शिक्षक यांची प्रश्ने प्रलंबीत न ठेवता मार्ग काढण्याची गरज होती. त्यांचे प्रश्न व मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने कर्मचारी, शिक्षकांच्या मनातील धगधगता असंतोष संपाच्या रुपाने बाहेर पडत आहे. जुनी पेन्शन हा एकमेव पर्याय शासनापुढे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सुभाष तळेकर म्हणाले की, जुनी पेन्शनच्या प्रमुख मागणीसाठी सर्व कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. शासनाने याची दखल घ्यावी. कोणत्याही परिणाम व कारवाईची भिती न बाळगता न्याय-हक्कासाठी हा लढा सुरु राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणात सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणाचा निषेध व्यक्त करुन सरकारवर टिका केली.