अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शहरातील जुन्या बसस्थानकासमोर तलवारी व धारदार शस्त्राने दोन गटांत हाणामार्या झाल्याची घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. हाणामारीत तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील दोन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
अरबाज अख्तर शेख (वय 24 रा. आशा टॉकीज चौक) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सारंग पान टपरीचे मालक गुल्लूभाई व त्याची दोन मुले सद्दाम व अरबाज तसेच आदम व इतर दोन-तीन लोकांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत आपण जाब विचारण्यासाठी गेलो असता अरबाज याने त्याच्या हातातील धारदार वस्तूने आपणावर वार केले.
या फिर्यादीवरून पोलिसांनी सारंग पान टपरीचे मालक गुल्लूभाई व त्यांच्या मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सय्यद अरबाज शकील याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कुरखान शकील शेख, सादीक शेख, अरबाज शेख, फैयाज शेख यांना वडिलांनी सिगारेट दिले नाही, म्हणून तलवारीने वार केला. सय्यद यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विरोधी गटाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.