आश्वी |वार्ताहर| Ashwi
संगमनेर - कोल्हार या राज्य महामार्गावर भरधाव वाहनावर कोणतेही नियत्रंण नसल्यामुळे संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी शिवारात मागील दोन महिन्यापासून अपघाताची मालिका सुरु आहे. दोन महिन्यात 4 नागरिकांचा बळी गेला असून अनेकजण गंभीर जखमी झाल्याने निमगावजाळी आरोग्य केंद्रासमोर गतिरोधक टाकण्याची मागणी करण्यात येत आहे.
संगमनेर-कोल्हार या राज्य महामार्गावरील निमगावजाळी शिवारात नियमीत होणार्या अपघाताचे प्रमाण वाढले असून या रस्त्यावर नागरीक, शालेय विद्यार्थी, दुचाकी, चारचाकी वाहनाची मोठी वर्दळ असते. निमगावजाळी आरोग्य केंद्रासमोर गतीरोधक नसल्याने भिषण अपघाच्या घटना वाढल्यामुळे मागील महिन्यात याठिकाणी झालेल्या अपघातात एका आरोग्य कर्मचार्याचा मृत्यू तर दोघे गंभीर झाले होते.
याठिकाणी गतिरोधक असल्यास वाहनांच्या वेगावर नियत्रंण येऊन अपघात टाळण्यासाठी मोठी मदत होईल असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच आश्वी पोलीस ठाणे यांच्याशी गतीरोधक बसवावा यासाठी निमगावजाळी आरोग्य केंद्राकडून पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
अपघाताच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच आर. के. कॉर्नर येथे गतीरोधक बसवावा यासाठी ग्रामपंचायतीकडून सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा सुरु करण्यात आला आहे.
- अमोल जोंधळे सरपंच निमगावजाळी
मागील महिन्यात रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या सहकार्याचा अपघात झाल्यामुळे जीव गमवावा लागला आहे. प्रवाशांच्या सुरक्षा कारणास्तव आम्ही गतीरोधक बसवण्याची मागणी केली आहे.
- डॉ. तय्यब तांबोळी आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र