
चांदा | वार्ताहर
नेवासा तालुक्यातील चांदा महसुलमंडळा अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये काल चारपासून मध्यरात्रीपर्यंत अवकाळी पाऊसाने हाहाकार केला असून अवकाळी बरोबरच आलेल्या वादळाने या भागातील अनेकांचे घरावरील पत्रे उडाली असून, मोठमोठी झाडे रस्त्यात आडवी झाल्याने वाहतुक ठप्प झाली होती.
अनेक ठिकाणी विजेच्या खाबांवरच झाडे पडल्याने रात्रीपासून विजपुरवठा खंडीत झाला आहे . दरम्यान आज शनिवार रोजी नेवासा तहसीलदार तालुका कृषी अधिकारी यांनी परिस्थिती पाहणी केली. काल शुक्रवार चार वाजेपासून चांदा, कौठा, बऱ्हाणपूर, देडगाव, पिंपळगाव , रस्तापर . लोहारवाडी परीसरात अचानक अवकाळी पाऊस सुरू झाला . या गावांमधील अनेक भागात गारा बरसल्या तर पाऊसाबरोबरच आलेल्या प्रचंड वादळाने होत्याचे नव्हते झाले. या वादळात पुंडवाडी रोडवरील सतिष पुंड यांचे नवीन घराचे काम स्लॅबलेव्हलपर्यंत आलेल्या चारही भिंती कोसळल्या तर ज्ञानदेव जावळे यांच्या शेडवर झाड पडल्याने शेड मोडले.
दत्तात्रय दरंदले यांचे राहत्या घराच्या भिंती पडल्या असून त्यात त्यांचा लहान मुलगा हर्षद (वय १२) मुलगी सानवी (वय ६) हे किरकोळ जखमी झाले आहे. तर विलास दहातोंडे यांच्या पडवीचे पत्रेही वादळात उडून गेले. सर्वाधिक फटका कौठा गावाला बसला असून तेथे मोठी हानी झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
गावातील आणि वस्तीवरील १५ते २० घरांचे छतावरील पत्रे उडून गेली आहेत. तर शेकडो झाडे उन्मळून पडली आहेत. अवकाळी पाऊस एवढा झाला की कौठा नदीला सुद्धा पाणि वाहिले. चांदा, घोडेगाव, चांदा -कुकाणा, चांदा, रस्तापूर, चांदा पिंपळगाव रस्त्यांवर मोठमोठी झाडे पडल्याने रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते.
या महसुलमंडळात काढणीस आलेला गहू, हरबरा, मका, आडसाली ऊस, ज्वारी भुईसपाट झाले आहेत. तर अनेक ठिकाणी कांदा काढणी सुरू होती. तोही पावसाच्या पाण्यात तरंगत आहे. त्यामुळे धाकधुक वाढली आहे. या भागात आतापर्यंत तिसऱ्यांदा अवकाळीचा दणका बसला आहे मात्र अजूनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही.
काल रात्री बारा वाजेपर्यंत पावसाचे थैमान सुरू होते. आज सकाळपासून नुकसानीचा अंदाज येत असून अवकाळीन बळीराजा हवालदिल झाला आहे. अनेकांचे प्रपंच उघडयावर आले आहेत. तर विजवितरणच्या मेन लाईनचे चांदा, कौठा गावात जवळपास १९ते २० पोल तसेच साध्या लाईनचे २७ पोलचे नुकसान असे जवळपास ५० पोल पडले.
तेलकुडगाव सबस्टेशनचे ३३ केव्ही पाच पोल पडले असल्याचे विज वितरण घोडेगाव विभागाचे मुख्य अभियंता बडे, चांदा उपअभियंता मराठे यांनी सागितले. दरम्यान काल बंद पडलेला विजपुरवठा आजही सुरळीत होऊ शकला नव्हता. पंचनामे होऊन बळीराजाला शासनाचा आर्थिक हातभार लागेल का? याची प्रतिक्षा बळीराजाला लागली आहे .
आज सकाळी नेवासा तहसिलदार संजय बिरादार तालुका कृषी अधिकारी डमाळे यांच्या पथकाने चांदा, कोठा, लोहारवाडी भागात येऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करत पंचनाम्याचे आदेश दिले असून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करण्यात येईल असे सांगितले.
यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय चिटणीस संभाजीराव दहातोंडे, माजी सरपंच डॉ विकास दहातोंडे, माजी सरपंच संजय भगत, भाजपाचे कैलास दहातोंडे, सरपंच सुनंदा दहातोंडे, तलाठी एन. टी. वाडेकर, लोहारवाडी तलाठी सिमा देठे, विजय रक्ताटे, किरण जावळे, सतिष पुंड, राजेंद्र शेटे, अमोल दहातोंडे आदीसह शेतकरी उपस्थित होते.