नेवासाफाटा |वार्ताहर| Newasa Phata
अहमदनगर- औरंगाबाद महामार्गावर नेवासा फाटा येथे नगरहून औरंगाबादच्या दिशेने भाजीपाला घेवून जाणार्या
407 टाटा टर्बो टेम्पोचे चालते चाक निखळून रस्त्याच्या बाजूला बसलेल्या तरुणाच्या डोक्यावर आदळल्याने या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.
याबाबत माहिती अशी की, की नगरहून औरंगाबादच्या दिशेने भाजीपाला घेवून चाललेल्या टाटा टर्बो कंपनीचा 407 टेम्पो (एमएच 12 एनएक्स 6157) भरधाव वेगात जात असताना या टेम्पोचे एक चाक निखळून ते रस्त्याच्या बाजूला सुमारे 75 फूट अंतरावर बसलेल्या संदिप बाळासाहेब जोंधळे (वय 33) रा. नेवासा खुर्द या युवकाच्या डोक्यावर आदळले.
गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या या तरुणास नेवासा फाटा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रथमोपचार करुन त्याला त्वरित नगर येथे हलविण्यात आले. युवकाचे औषधोपचार करण्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने नेवासा शहरासह नेवासा फाटा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघाताचे दुर्देवी वैशिष्ट्य म्हणजे नगरकडून - औरंगाबादच्या दिशेने भाजीपाला घेवून जात असलेल्या या टेम्पोचे टायर राजमुद्रा चौकात निखळले तरीही हा टेम्पो सुमारे शंभर फुटावर असलेल्या हॉटेल आकाशपर्यंत आला व तेथून हे टायर टेम्पोतून सुटून सुमारे 75 फुटावर रस्त्याच्या आडबाजूला दुकानाच्या आडोशाला बसलेल्या युवकाच्या डोक्यावर जाऊन आदळले.
टेम्पोचे डाव्या बाजूचे चाक निखळून उजव्या बाजूला रस्त्याच्या पलिकडे महामार्ग पार करुन गेले. अपघातात क्लिनरसाईडचे मागचे दोन्ही चाक निखळले असून या चाकाला सात ते आठ नट असताना एकाचवेळी ते सर्व निखळलेच कसे? किंवा कोणी नटबोल्ट ढिले करुन टेम्पोचे नुकसान व्हावे म्हणून काही चाल खेळली की काय? अशा एक ना अनेक शंकांचे गुर्हाळ या अपघातानंतर सुरु झाले आहे.