देवगडफाटा (वार्ताहर) -
नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे आयोजित दत्तजयंती महोत्सवाची बुधवारी भास्करगिरी महाराजांच्या हस्ते काल्याची
दहीहंडी फोडून सांगता करण्यात आली.
दत्त अवतार हा देव, देश व धर्म या तिन्हींची जाणीव करून देणारे प्रतीक रूप असल्याचे प्रतिपादन भास्करगिरी महाराज यांनी यावेळी केले.
देवगड येथील कीर्तन मंडपात काल्याच्या किर्तनात भास्करगिरी महाराज म्हणाले की श्रद्धा ही अशी आहे की जी नष्ट करता येत नाही. श्रद्धेमुळेच भारतीय माणूस आज टिकून आहे, युवा पिढी ही देशाची रक्षक असून दूध हाच त्यांच्यासाठी सकस आहार आहे असे सांगून त्यांनी दत्त महिमा व सद्गुरू किसनगिरी बाबांचे कार्य विषद केले.
यावेळी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बाल लीलांचे वर्णन गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी केले. यावर्षी छोटेखानी पद्धतीने पार पडलेल्या दत्तजन्म उत्सव सोहळयात योगदान देणार्यांचे शब्द सुमनांनी स्वागत करून आभार मानले. उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.