किरकोळ कारणातून नेप्तीत तरुणावर तलवार, चाकूने हल्ला

किरकोळ कारणातून नेप्तीत तरुणावर तलवार, चाकूने हल्ला

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - हॉटेलमध्ये आरडाओरडा करू नका, असे म्हटल्याचा राग आल्याने एका तरुणावर दोघांनी तलवार, चाकूने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात राहुल भाऊसाहेब आंग्रे (वय 26 रा. एकनाथनगर, केडगाव) हा तरुण जखमी झाला आहे. 11 जुलै रोजी दुपारी चार वाजता नेप्ती (ता. नगर) शिवारातील हॉटेल दर्पन येथे घडलेल्या या घटनेची फिर्याद गुरूवारी (दि. 15) नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. जखमी राहुल आंग्रे यांनी ही फिर्याद दिली आहे.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हल्ला करणारे रोहित राजू आल्हाट, भाऊ दत्तू साळवे, गौरव राजू आल्हाट (सर्व रा. निलक्रांती चौक, नगर) यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 11 जुलैला दुपारी चार वाजता राहुल आंग्रे व त्यांचा मित्र हॉटेल दर्पण येथे जेवण करण्याकरिता गेले होते.

त्याठिकाणी रोहित आल्हाट, भाऊ साळवे, गौरव आल्हाट हे बसलेले होते. त्यांचा आरडाओरडा पाहून राहुल त्यांना म्हणाले, आरडाओरडा करू नका. असे म्हणाल्याचा राग आल्याने रोहित आल्हाट याने त्याच्याकडील तलवारीने व भाऊ साळवे याने त्याच्याकडील चाकूने राहुलच्या डोक्यावर, हातावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपींनी राहुल यांच्यासह त्यांच्या मित्राला शिवीगाळ, मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास उपनिरीक्षक बोडके करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com