कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे नागपूर ते शिर्डी-कोपरगाव पर्यंतचे काम पूर्ण झालेले आहे. कोपरगाव तालुक्यातील इंटरचेंजला जगप्रसिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्र शिर्डीचे इंटरचेंजला नाव देण्यात आलेले आहे. समृद्धी महामार्गासाठी कोपरगाव तालुक्यातील शेतकर्यांच्या जमिनी घेण्यात आल्या असून समृद्धी महामार्गाचे कोपरगाव तालुक्यातील अंतर जवळपास 30 किलोमीटरचे आहे.
त्यामुळे या शिर्डी इंटरचेंजला शिर्डी-कोपरगाव इंटरचेंज असे नाव देण्यात यावे. तसेच या शिर्डी इंटरचेंज परिसरात होणार्या टोल प्लाझाला देखील शिर्डी बरोबरच कोपरगावचे देखील नाव जोडले जावून शिर्डी-कोपरगाव टोल प्लाझा असे नाव देण्यात यावे अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे नागपूर ते शिर्डी पर्यतच्या पूर्ण झालेल्या कामाचे उद्घाटन दि.11 रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते कोपरगाव -शिर्डी पर्यतच्या पूर्ण झालेल्या कामाची शिर्डी पर्यंत पाहणी केली. त्यावेळी आ. आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांची भेट घेवून त्यांना कोपरगाव तालुक्यातील जनतेच्या भावना निवेदनाच्या माध्यमातून सांगितल्या.