राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
अखेर 20 महिन्यांनंतर राहाता नगरपालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळाला. सुहास जगताप यांची मुख्याधिकारी पदी नेमणूक झाल्याने ठप्प झालेल्या विकास कामांना चालना मिळेल, अशी आशा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
20 महिन्यांपासून राहाता पालिकेला मुख्याधिकारी नसल्याने येथे प्रभारी राज सुरू होर्ते मुख्याधिकारी नसल्याने पालीका प्रशासनाला काम करताना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत होत्या. आता या सर्व कामांत सुसूत्रता येईल तसेच कर्मचार्यांच्या व्यथा ऐकून त्यांना न्याय मिळेल. यामुळे कर्मचारी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पालिकेतील तीन गटातटांच्या वादातही अनेक प्रकल्प रखडले असून मुख्याधिकारी आल्याने यात समझोता होऊन पुढील दीड वर्षांत विकासाची कामे होऊ शकतील.
सुहास जगताप यांनी आज राहाता पालिकेचा मुख्याधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला ते यापूर्वी जामखेड नगरपालिकेत कार्यरत होते .पालिकेतील कर्मचारी व उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, नगरसेवक साहेबराव निधाने, निवृत्ती गाडेकर, बाळासाहेब गिधाड, राजेंद्र अग्रवाल, दिपक सोळंकी यांनी त्यांचा सत्कार करत त्यांना शुभेच्छा दिल्या.