अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर अर्बन बँकेच्या सत्तेतील व्यवस्थापनास भविष्यात नवीन ठेवी स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली तरी त्या ठेवी स्वीकारणे व त्याठेवींची काळजी घेण्याऐवढी बँकेच्या संचालक मंडळाची कुवत व नियत (कॅरेक्टर) आहे का? हा मुद्दा देखील खूप महत्त्वपूर्ण आहे, अशी भावना नगर अर्बन बँक बचाव कृती समितीने व्यक्त केली आहे. नगर अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँकेने लावलेल्या दुसर्या टप्प्यातील तीन महिन्यांच्या निर्बंधांची मुदत आज मंगळवारी (6 सप्टेंबर) संपणार आहे.या पार्श्वभूमीवर बँक बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी सोशल मीडियातून भाष्य करताना बँक सत्ताधार्यांची कुवत व नियत याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
यासंदर्भात माजी संचालक गांधी म्हणाले, नगर अर्बन बँकेच्या बाबतीत आज किंवा उद्या निर्णय घेताना रिझर्व्ह बँकेकडून तीन प्रमुखमुद्यांवर जास्त फोकस केला जाण्याची शक्यता आहे. नगर अर्बन बँकेची नफा क्षमता, बँकेची सद्य आर्थिक क्षमता म्हणजे बँक ठेवीदारांना पैसे परत देण्याच्या परिस्थितीमध्ये आहे किंवा नाही आणि सत्तेवरील व्यवस्थापनाची नियत व कुवत. तसेच बँकेची नफा क्षमता तपासताना डीआयसीजीचे (डिपॉझीट गॅरंटी कॉर्पोरेशन) 300 कोटी, पाच लाखांवरील ठेवीदारांंचे 35़0 कोटी व या एकूण 650 कोटीवर सुरू असलेले व्याज यासह विविध तरतुदी, कर्मचारी पगार, जागा भाडे, मेन्टनस, लाईटबील, फोन बील यासाठी लागणारा खर्च आणि या तुलनेत बँकेला येणारे उत्पन्न यांचा मेळ बसतो किंवा नाही बसत, याचा विचार रिझर्व्ह बँकेकडून होण्याची शक्यता आहे.
तसेच आर्थिक क्षमता तपासताना नगर अर्बन बँकेला सद्यस्थितीत डीआयसीजीसीचे 300 कोटीचे पुढील देणे व पाच लाखांपुढील ठेवीदार-खातेदारांचे 350 कोटी रुपये असे दोन प्रमुख दायित्व (लायबिलीटीज्) आहेत. ही दोन प्रमुख देणी चुकविण्यासाठी बँकेकडीलप्रमुख मालमत्तेची (अॅसेटस्) गुणवत्ता म्हणजे कर्ज येणेबाकी पैकी किती कर्जे वसूलहोणेसारखी आहेत तसेच एक रकमी परतफेड मधून किती वसूल होतील व फ्रॉडप्रकरणे किती आहेत याचा विचार रिझर्व्ह बँक करणार, असा दावा करून गांधी म्हणाले, कर्ज येणेबाकीतून दोन प्रमुखदायीत्व देण्याइतपत बँकेची आर्थिक क्षमता आहे का? हे प्रामुख्याने तपासले जाण्याची शक्यता आहे. तसेच बँकेच्या सत्तेवरील व्यवस्थापनास भविष्यात नवीन ठेवी स्वीकारण्यास परवानगी दिली तर त्या ठेवी स्वीकारणे व त्या ठेवींची काळजी घेण्याइतपत बँकेच्या संचालक मंडळाची कुवत व नियत (कॅरेक्टर) आहेका? हा मुद्दा देखील खूप महत्वपूर्ण ठरणार आहे, असा दावाही त्यांनी केला.