
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
स्थापनेचा शतक महोत्सव गाठलेल्या नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल बँकेचा (Nagar Urban Multistate Schedule Bank) बँकिंग व्यवहार करण्याचा परवाना (License) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवारी रद्द केला. त्यामुळे आता ही बँक बंद झाली आहे. आता या बँकेवर रिझर्व्ह बँकेव्दारे (Reserve Bank of India) अवसायक (लिक्विडेतर) नेमला जाणार असून त्याच्याव्दारे थकीत कर्जाची वसुली करून ठेवीदारांचे पैसे परत देण्याची कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र 113 वर्षाच्या वाटचालीत अनेक सामान्यांचे संसार उभे करणार्या नगर बँकेचे व्यवहार आता बंद झाल्याने नगरमध्ये खळबळ उडाली आहे.
नगर अर्बन बँकेवर (Nagar Urban Bank) एक डिसेंबर 2021 पासून निवडून आलेल्या संचालकांची सत्ता आहे. मात्र नवे सत्ताधारी आल्यानंतर चार-पाच दिवसातच रिझर्व्ह बँकेने या बँकेच्या कामकाजावर निर्बंध लावले. या निर्बंधांना आता पावणे दोन वर्ष होत आले आहेत. यादरम्यान बँकिंग कामकाज समाधानकारक नसल्याने तसेच थकबाकी वसुलीही पुरेशी होत नसल्याने बँकेचा बँकिंग व्यवहार करण्याचा परवाना (License) रद्द का करण्यात येऊ नये, अशी नोटीस 22 जुलै 2022 रोजी रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन बँकेला दिली होती. त्यावर बँकेकडून व संचालक मंडळाकडून आलेला खुलासा समाधानकारक नसल्याने अखेर सव्वा वर्षाननंतर रिझर्व्ह बँकेने बुधवारी नगर अर्बन बँकेचा बँकिंग व्यवहाराचा परवाना रद्द केला. यामुळे आता या बँकेचे सर्व व्यवहार बुधवार सायंकाळपासून बंद झाले आहेत.
बँकेच्या पूर्वी 47 शाखा होत्या. यापैकी समाधानकारक व्यवहार नसलेल्या अकरा शाखा प्रशासकांच्या काळात बंद झाल्या व आता 36 शाखा आहेत. मात्र आता नगरच्या मुख्यालयासह सर्व शाखांचे व्यवहारही बंद झाले आहेत. यामुळे नगर शहरासह या बँकेच्या राज्याच्या सात जिल्ह्यात असलेल्या शाखांच्या परिसरातही खळबळ उडाली आहे. बँकेच्या सुमारे 1600 वर थकबाकीदाराकडे सुमारे साडेचारशे कोटींची मुद्दल व त्यावरील व्याज मिळून तब्बल 827 कोटीचे येणे बाकी आहे. याशिवाय डिपॉझिट गॅरंटी कॉर्पोरेशनने बँकेच्या पाच लाखातील सुमारे पंधरा हजारावर ठेवीदारांना त्यांचे पैसे दिले आहेत. ते 294 कोटी रूपये देणे असून त्यापैकी 60 कोटी रूपये बँकेने त्यांना दिले आहेत व अजून सुमारे 240 कोटी रूपये देणे आहे तसेच पाच लाखावरील ठेवीदारांनाचेही सुमारे 300 कोटी रूपये देणे आहे. याशिवाय सुमारे पावणे तीनशे कर्मचारी असून त्यांचाही फंड व पगार देणे आहे. पण, आता या बँकेचा परवाना रद्द झाल्याने कर्मचारी व ठेवीदारांचे पैसे परत मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आयुष्यातील काळा दिवस - गांधी
नगर अर्बन बँकेचा बँकिंग परवाना रद्द होणे हा आयुष्यातील काळा दिवस आहे, अशी भावना नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी व्यक्त केली. ही बँक आधी राज्य सरकारच्या सहकार खात्याचे अधिपत्याखाली होती, तेव्हा बँकेची प्रगती चांगली होती, पण 2013 मध्ये ती मल्टीस्टेट केली व ही सर्वात मोठी चूक झाली आणि बँक बंद व्हायची प्रोसेस तिथूनच चालू झाली. त्यानंतर जे संचालक दोषी होते, त्यांनी परत बँकेत यायलाही नको होते. पण आधी केलेली बोगस कामे मिटवायला ते आले व आता त्यांच्या उद्योगामुळेच बँक बंद झाली, पण 113 वर्षांची परंपरा असलेली बँक बंद झाल्याची ही बातमी ऐकताना मनाला खूप वेदना होतात, अशी भावनाही गांधी यांनी व्यक्त केली.