अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर - पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. नगर जिल्ह्याच्या हद्दीत मागील 2019 ते 2022 या साडेतीन वर्षाच्या कालावधी 150 अपघात झाले असून यात 170 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. चालू वर्षी अवघ्या सात महिन्यांच्या कालवधीत 13 अपघातात 15 जणांना जीव गमवावा लागला आहे.
पुणे- नगर महामार्गावर महामार्गावर नगर जिल्ह्याची हद्द नगरपासून वाडेगव्हाणपर्यंत अशी 55 किलोमीटर अंतराची आहे. केवळ या 55 किलोमीटरच्या परिसरातच मागील साडेतील वर्षात 150 पेक्षा अधिक अपघात झाले आहेत. जखमी होणारांचे प्रमाण 500 पेक्षा अधिक आहे. हे अपघात प्रामुख्याने पवारवाडी घाट व सुपे घाट परिसरात होण्याचे प्रमाण मोठे आहे. अपघातांचे प्रमुख कारण अतिवेग व वाहनावरील नियंत्रण सुटने हेच असल्याचे समोर आले आहे.
प्रामुख्याने घाटातही अतिवेगात समोरील वाहनाला मागे टाकून जाण्याचा प्रयत्नात हे अपघात झाल्याचे वाहतुक पोलीस सांगत आहेत. यानंतर रस्ता ओलांडताना होणार्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावर अनेक पेट्रोलपंप चालक, हॉटेल चालक यांनी मनमानी करत दुभाजक फोडल्याने अचानक मध्येच वाहन रस्ता ओलांडताना मागील वाहन चालकास लक्षात न आल्याने हे आपघात होत आहेत. अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचे मृत्यु तसेच जखमी होण्याचे प्रमाण मोठे आहे. तसेच कार अपघातांचे प्रमाणही अधिक आहे. अनेकदा पायी रस्ता ओलांडणारे नागरीक, वाहनांसाठी वाट पाहत थांबलेल्या प्रवाशांनांही भरधाव वाहनांनी उडवल्याच्या घटना घडल्या आहेत.
मागील साडेतीन वर्षांमध्ये सर्वाधिक अपघात 2019 मध्ये नोंदवण्यात आले आहेत. या वर्षी 55 अपघातात 64 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 2021 मध्ये सर्वात कमी 37 अपघातात 42 जण ठार झाले आहेत. तर चालु वर्षी जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या काळात 13 अपघातात 15 जण ठार झाले आहेत. ऑगस्ट महिन्याची आकडेवारी उपलब्ध झाली नसली तरी या महिन्यात सर्वाधिक अपघात झाले असून आठ पेक्षा अधिक व्यकींचा मृत्यु झाला आहे. नगर- पुणे महामार्गावरील केवळ नगर जिल्ह्या हद्दीत हे अपघात झालेले आहेत. त्या पुढील शिरूर ते पुणे या हद्दीतील अपघातांचा आकडाही मोठा असून पंधरा दिवसापुर्वीच शिरूर हद्दीत ट्रक व कारच्या अपघातात शेवगाव तालुक्यातील एकाच घरातील पाच जणांचा मृत्यु झाल्याची घटना घडली होती.
अशी अपघातांची आकडेवारी
वर्ष अपघात मृत्यू
2019 55 64
2020 45 49
2021 37 42
जुलै 2022 13 15
एकूण 150 170