
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शहरातील कचरा संकलन व वाहतुकीच्या कामासाठी तीन कंपन्यांच्या निविदा दाखल झाल्या आहेत. पुण्याच्या एका कंपनीसह कर्नाटकातील बेंगलोर व गुजरातमधील अहमदाबाद येथील कंपन्यांनी नगर शहरात काम करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, महिनाभरापासून तांत्रिक छाननीच्या प्रक्रियेत ही निविदा प्रक्रिया रखडली आहे.
महापालिकेकडे पुण्यातील बीव्हीजी इंडिया लिमिटेड, बेंगलोर येथील पी. गोपीनाथ रेड्डी व अहमदाबाद येथील श्री जी एजन्सी या तीन कंपन्यांच्या निविदा दाखल झाल्या आहेत. दाखल झालेल्या निविदांपैकी पुण्याच्या बीव्हीजी इंडिया लिमिटेड या कंपनीच्या निविदेवर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे निविदा दरपत्रके उघडण्यापूर्वीच बीव्हीजी इंडिया कंपनीची निविदा वादात सापडली आहे.
प्रशासनाने या कामासाठी फेरनिविदा मागवाव्यात, अशी मागणीही पुढे आली आहे. मात्र यासंदर्भात महापालिका प्रशासनाने अद्याप निर्णयच घेतलेला नाही. मागील सोमवारी महापालिकेच्या तांत्रिक छाननी समितीमार्फत निविदांची छाननी केली जाणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर आठवडा लोटला तरी छाननीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.