मुळा कारखान्याचे 4 कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट

कारखान्याच्या 52 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार शंकरराव गडाख यांनी दिली माहिती
मुळा कारखान्याचे 4 कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट

सोनई |वार्ताहर| Sonai

मुळा कारखान्याच्या नवीन इथेनॉल प्रकल्पातून सन 2021-22 च्या हंगामात सव्वा कोटी लिटरची इथेनॉल निर्मिती झाली असून आता ऑक्टोबर मध्ये सुरू होणार्‍या हंगामात 4 कोटी लिटरचे इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असल्याची माहिती आ. शंकरराव गडाख यांनी दिली. गुरुवारी झालेल्या मुळा कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला माजी खासदार व कारखान्याचे संस्थापक ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख उपस्थित होते. तसेच कारखान्याचे उपाध्यक्ष कडूबाळ कर्डिले, कारखान्याचे सर्व संचालक व सभासद उपस्थित होते.

आ.गडाख म्हणाले, इथेनॉलचे दर शासनाने निश्चित केलेले आहेत. इथेनॉल उत्पादनाला शासनाचे प्रोत्साहन असून आर्थिक स्थैर्याच्यादृष्टीने इथेनॉल निर्मितीला देशात महत्त्व दिलं जात आहे. मुळा कारखान्याने इथेनॉल प्रकल्प उभारून 1 लाख लिटर प्रतिदिन इथेनॉल निर्मितीची क्षमता निर्माण केली असून त्यासाठी 90 कोटी रुपये खर्च केले आहेत. मागील वर्षी प्रकल्प उशिरा सुरू झाल्याने सव्वा कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती झाली. पण आता ऑक्टोबर पासून सुरू होणार्‍या गाळप हंगामात 4 कोटी लिटर इथेनॉल ची निर्मिती केली जाईल.

पुढील साखर हंगामात देशात जवळपास 360 लाख टन तर महाराष्ट्रात 145 लाख टन साखर निर्मिती होण्याचा अंदाज असून साखर कारखान्यांचे शिल्लक साठे कमी करून आर्थिक तरलता येण्यासाठी तसेच स्थानिक बाजारात साखरेचे दर वाढण्याच्यादृष्टीने किमान 125 लाख टन साखर निर्यात करण्यास केंद्र सरकारने कारखान्यांना परवानगी द्यावी ,अशी मागणी आमदार शंकरराव गडाख यांनी केली.

अहवाल सालात 164 कोटीची कर्जफेड केली. गळीताचा रेट वाढवला. 15 लाख 31 हजार टनाचं विक्रमी गाळप केलं. 97 कोटीचं इथेनॉल उत्पादन केलं. 42 कोटींची वीज निर्मिती केली. सभासदांची परतीची शेवटची ठेव 5 कोटींची राहिली होती ती व्याजासह दिवाळीपूर्वी देण्याचा निर्णय आमदार गडाख यांनी जाहीर केला. एप्रिल व मे महिन्यात गळीत झालेल्या उसाला सव्वा तीन कोटी तर ऊस तोडणी मजुरांना एक कोटीचे अनुदान दिल्याचे त्यांनी सांगितले.

उसाचा दर 2435 प्रमाणे जाहीर करून पूर्वी दिलेली रक्कम वजा जाता फरक रकमेचे पेमेंट दिवाळीपूर्वी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

10 हजार टन विस्तार वाढीला मंजुरी

कारखान्याच्या कार्यक्षेत्रात दरवर्षी 14 ते 15 लाख टन उसाचे उत्पादन होते. उशिरापर्यंत कारखाना चालवावा लागतो. उन्हाळ्यात मजुरांची ऊस तोडण्याची क्षमता कमी होते. जायकवाडी धरण भरलं नाही तर मुळा धरणाचे पाणी मराठवाड्याला जाते. म्हणून ज्यादा क्षमतेने गऴीत करून हंगाम 15 किंवा 30 एप्रिल अखेर चालवल्यास ते सभासदांच्या दृष्टीनेही लाभदायक ठरेल. म्हणून कारखान्याची गाळप क्षमता 7 हजार टनावरून 10 हजार टनापर्यंत करण्यास सभासदांनी मंजुरी दिल्याबद्दल आमदार गडाख यांनी आभार मानले.

मागील हंगामात आलेल्या अडचणी व ऊस तोडी बाबत शेतकर्‍यांच्या आलेल्या तक्रारी लक्षात घेऊन आमदार गडाख यांनी आजच्या सभेत काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. कारखान्याच्या दैनंदिन गाळपाचा रेट किमान 9 हजार टन राहील. आगामी वर्षात 4 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट राहील. ऊस नोंदीच्या याद्या हंगाम सुरू होण्यापूर्वीच गट ऑफिसला प्रसिद्ध केल्या जातील. सभासदांनी त्या याद्या बघून त्याबाबतीत काही तक्रार किंवा हरकत असेल तर कारखान्यावर ठेवण्यात येणार्‍या तक्रार पेटीत ती तक्रार द्यावी. त्यासाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात येईल आणि अशा तक्रारीचे वेळीच निवारण करण्यात येईल, असे आमदार गडाख यांनी सांगितले.

हार्वेस्टरने ऊस तोडण्याची मानसिकता सभासदांमध्ये तयार झाली पाहिजे. ज्यांचा दोन किंवा तीन एकराच्या पुढे ऊस आहे अशा सभासदांना हार्वेस्टरने ऊसतोड देण्याच्या बाबतीत धोरण घेतले जाईल. रोज 11 हजार टन ऊस तोड करण्याची यंत्रणा भरण्यात येईल. याप्रमाणे निर्णय जाहीर करून त्याची जबाबदारी संबंधित अधिकार्‍यांवर सोपविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

मागील हंगामात एप्रिलनंतर ऊस तोडणीसाठी काही ठिकाणी लेबरने पैसे मागितल्याच्या तक्रारी आल्या होत्या. तो अनुभव जमेला धरून यंदा हंगाम सुरू होण्यापुर्वीच सर्व मुकादम आणि हार्वेस्टर मालकांची मिटींग घेऊन त्यांना शेतकर्‍यांकडे पैसे मागू नयेत अशा सक्त सूचना दिल्या जातील. तसेच ऊस उत्पादकांनी सुध्दा ऊस तोडणीसाठी कोणाच्याही अमिषाला बळी पडू नये ,असे आवाहन त्यांनी केले.

सुरुवातीला कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर यांनी स्वागत करून मागील सभेचे इतिवृत्त व अहवालाची माहिती दिली. कारखान्याचे सचिव रितेश टेमक, चिफ अकाउंटंट हेमंत दरंदले, ऑफिस सुपरीटेंडेंट योगेश घावटे यांनी या विषयवार माहिती दिली.

सभेत सर्वश्री सीताराम झिने, जालिंदर येळवंडे, शरद जाधव, दादासाहेब चिमणे, बाळासाहेब सोनवणे, रामकिसन शिंदे, राजेंद्र टेमक, आप्पासाहेब निमसे, जनार्धन कुसळकर यांनी चर्चेत भाग घेतला. डेव्हलपमेंट मॅनेजर व्ही.के.भोर यांनी सभेचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी कारखान्याचे सभासद मोहन बाजीराव सोनवणे (मोरगव्हाण), रामदास गोरक्षनाथ काळे (इमामपूर), विजयाबाई अशोक आहेर (म्हा.पिंपळगाव), अनिता शिवाजी जोशी (अंमळनेर) यांनी एकरी सर्वाधिक ऊस उत्पादन घेतल्याबद्दल त्यांचा आमदार गडाख यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.

कारखान्याच्या नामांतराची मागणी

मुळा कारखान्याचे ‘लोकनेते यशवंतरावजी पाटील गडाख मुळा सहकारी साखर कारखाना’ असे नामांतर करावे अशी मागणी करजगावचे युवा नेते राजेंद्र टेमक यांनी करताच त्याचे सभासदांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com