खासदार सुजय विखे म्हणाले, ‘सत्ता’ डोक्यात शिरते तेव्हा काहीजण...

बहिरबोवाडी येथे नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार
खासदार सुजय विखे म्हणाले, ‘सत्ता’ डोक्यात शिरते तेव्हा काहीजण...

कर्जत (वार्ताहर) -

सत्ता मिळाल्यावर काही जण एवढे उंच उडतात की त्यांना समोरील सर्व छोटे वाटतात मात्र या छोट्यांनी आसमान

दाखवल्यावर त्यांना जागा कळते, अशी टीका खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली.

बहिरबोवाडी येथे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अशोक खेडकर यांनी जिल्हा सहकारी बँकेवर विजयी झालेले भाजपचे शिवाजीराव कर्डिले, अंबादास पिसाळ व अमोल राळेभात यांचा सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी नगराध्यक्ष नामदेव राऊत, शांतीलाल कोपनर, डॉ. सुनील गावडे, बाळासाहेब शिंदे, अ‍ॅड. रमेश अनभुले, प्रकाश शिंदे, सचिन पोटरे, सरपंच विजय तोरडमल, काकासाहेब धांडे, अंगद रुपनर, सुनील यादव, पप्पू दोधाड आदी उपस्थित होते.

खा. डॉ. विखे पाटील यांनी चौफेर टीका केली. त्यांचा आमचा 50 वर्षांचा अनुभव आहे. त्यांच्याकडे पैसा असेल परंतु कार्यकर्त्यांना मानसन्मान व स्वाभिमान त्याठिकाणी गहान घेऊन जावे लागेल व तसा अनुभव कर्जत तालुक्यातील आता अनेकजणांना आला असावा. कारण अनेकजण आता तुम्ही म्हणत होता ते खरे आहे, असं बोलून दाखवत आहेत. जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक राजकारण नको, बिनविरोध शेतकर्‍यांसाठी व्हावी यासाठी मी व कर्डिले यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र अंबादास पिसाळ हे विजयी होणार यासाठी मी बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर देखील चर्चा केली होती. याचे साक्षीदार कर्डिले आहेत.

कर्जत येथील जिल्हा बँकेची जागा सहज आणि सोपी होती. काही जणांनी ही जागा प्रतिष्ठेची करत अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला; परंतु भाजप व विखे गट येथे एक दिलाने लढल्यामुळे विजय मिळाला. जिल्ह्याने राज्याला पुन्हा एकदा दाखवून दिले की या ठिकाणी राजकारण हे व्यक्तीच्या संबंधावर अवलंबून असते व भविष्यात देखील आपण सर्वजण एक दिलाने एकत्र आल्यास कर्जत नगरपंचायतमध्ये भाजपची सत्ता आणतानाच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये सर्वांनी एक दिलाने मनापासून एकत्र येण्याची गरज आहे.

यावेळी शिवाजीराव कर्डिले म्हणाले की जिल्हा बँक ही शेतकर्‍यांची बँक असल्याने याठिकाणी राजकारण न करता भाजपने सर्वांना बरोबर घेऊन निवडणूक लढवण्याचे ठरवले होते. राधाकृष्ण विखे पाटील यांनी माझ्यावर सर्व जबाबदारी सोपवली होती; परंतु जिल्ह्यातील साखर कारखानदारीतील मंडळींनी एकत्र येऊन त्यांच्या जागा बिनविरोध निवडून आणण्यासाठी एकमेकाला मदत करताना जिरायत भागातील आमच्यासारख्या लोकांना मात्र निवडणूक लढवण्याची वेळ आली. ही बँक केवळ कारखानदारांची नसून सर्व शेतकर्‍यांचे आहे. हे त्यांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे. यावेळी प्रास्ताविक अशोक खेडकर यांनी केले तर अंबादास पिसाळ व बाळासाहेब शिंदे यांचे भाषण झाले. सूत्रसंचालन दादासाहेब शिंदे यांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com