
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
शिवसेनेच्या संदर्भात केलेले भाष्य हे फक्त पारनेर तालुक्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर होते. परंतु त्याचा राज्याच्या राजकारणाशी संबंध जोडून विपर्यास केला गेला. जिल्ह्यात राजकीय निर्णय घेताना प्रदेश भाजप पदाधिकार्यांचाच अंतिम आदेश मानला जाईल, असा खुलासा खा. डॉ सुजय विखे पाटील यांनी पाठवला आहे. पारनेर तालुक्यातील कार्यक्रमात बोलताना खा. डॉ. विखे पाटील म्हणाले होते की, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून मला निवडून आणण्यात पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
परंतु या तालुक्याच्या बदलत्या राजकीय वातावरणात शिवसैनिकांवर होत असलेला अन्याय, तसेच राज्यात आघाडी सरकार असतानाही तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा होत नसलेला विचार पाहता या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची किंवा त्यांना बरोबर घेऊन जाण्याच्यादृष्टीने आपण भाष्य केले. परंतु माझ्या वक्तव्याचा थेट राज्यातील राजकारणाशी संबंध जोडून विपर्यास करण्यात आला आहे.
जिल्ह्यात कोणतीही राजकीय भूमिका किंवा निर्णय करताना अंतिम निर्णय हा प्रदेश आणि जिल्ह्यातील भाजप पदाधिकार्यांना विश्वासात घेऊनच करण्याची भूमिका आपली कायम असून याबाबतचा अंतिम निर्णय सुध्दा त्याचाच असणार आहे. पारनेर तालुक्याच्या राजकीय परिस्थितीची वस्तूस्थिती वरिष्ठांना देऊन यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.