शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi
देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या श्री साईबाबांच्या शिर्डीत देशविदेशातील भावीक दर्शनासाठी येतात त्यांच्या
भावना तसेच प्रशासनाच्या त्रुटी प्रसारमाध्यमांनी दाखवणे हे काही चुकीचे नसून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवर गुन्हे दाखल होणे ही बाब निषेधार्ह आहे, या गोष्टीचे कोणीही समर्थन करू शकत नाही, म्हणून झालेली घटना निश्चितच दु:खद असून अशाप्रकारचे गुन्हे साईबाबा संस्थानने तात्काळ मागे घ्यावेत अशी मागणी माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
शिर्डी पोलीस ठाण्यात साईबाबा संस्थानच्यावतीने पत्रकार नितीन ओझा व मुकुल कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, शिर्डी शहरात भाविकांच्या भावना त्याचप्रमाणे प्रशासनाच्या त्रुटी दाखवणे यात काहीही चुकीचे नाही.
याउलट त्यातून सुधारणा करून अधिक उत्तम प्रकारच्या सुविधा निर्माण करून देण्याचे काम साईबाबा संस्थानने करण्याची आवश्यकता आहे. मात्र पत्रकारांवर गुन्हे दाखल करणे हा काही पर्याय होऊ शकत नाही. मतभेद असू शकतात परंतु मतभेदाचे स्वरूप गुन्ह्यामध्ये दाखल करून त्यामधून परिवर्तन होणे हे योग्य नव्हे.
त्यामुळे यातून निश्चितच मार्ग काढावा लागेल. समज, गैरसमज झाले असतील. साईबाबा संस्थानचे अधिकारी आणि प्रसारमाध्यमांनी हा प्रश्न सोडवला पाहिजे, असे मत व्यक्त करत जेथे माझी आवश्यकता असेल त्याठिकाणी मी स्वतः समन्वय घडवून आणण्यासाठी पुढाकार घेईल. शिर्डी शहराचा विकास आणि संस्थानची भूमिका यामध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत असल्याचे आ. विखे पाटील यांनी सांगितले.