<p><strong>लोणी |प्रतिनिधी| Loni</strong></p><p>गावाच्या विकासाची चावी तुमच्या हातात आली आहे. सर्वांना विश्वासात घेऊन नव्या गावकारभार्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे, </p>.<p>समाजाच्या हितासाठी योजनांची अंमलबजावणी करा आणि स्वयंरोजगाराच्या निर्मितीतून गावे आत्मनिर्भर बनवा, असे आवाहन भाजपाचे ज्येष्ठनेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.</p><p>शिर्डी मतदार संघातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, गणेश कारखान्याचे चेअरमन मुकूंदराव सदाफळ, चेअरमन नंदू राठी, व्हा. चेअरमन प्रतापराव जगताप, विश्वासराव कडु, सभापती नंदाताई तांबे, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजूरकर, भाजपाचे उपाध्यक्ष अॅड. रघुनाथ बोठे, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, शिर्डी शहराध्यक्ष सचिन शिंदे, उपनगराध्यक्ष हरिश्चंद्र कोते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. </p><p>या कार्यक्रमात सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार रोपे देऊन करण्यात आला. शिर्डी मतदार संघात सुरू असलेल्या मोफत अपघात विमा योजनेतील लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.</p><p>आ. विखे पाटील म्हणाले की, या निवडणुकीच्या निमित्ताने गाव कारभार हाकण्यासाठी सर्वांनीच दाखविलेली सक्रीयता महत्त्वाची होती. परंतु निवडणुकीत झालेले मतभेद विसरून पुन्हा एकदा गावाच्या विकासासाठी आपल्याला कटिबध्द व्हावे लागेल. गावाच्या विकासाचे केंद्र हे ग्रामपंचायतच असून विकासाच्या चाव्या आता ग्रामपंचायतीच्या हाती आल्या आहेत. मिळालेल्या संधीचा तुम्ही कसा उपयोग करता यावरच गावाचे गावपण आधोरेखीत होणार असल्याचे त्यांनी सूचित केले.</p><p>पंचायतराज व्यवस्थेत झालेल्या घटना दुरस्तीनंतर 50 टक्के महिलांना निर्णय प्रक्रीयेत अधिकार मिळाले आहेत. निवडून आलेल्या महिला सदस्यांनी स्वत: पुढाकार घेवून गाव कारभार करण्याची गरज व्यक्त करून आ. विखे पाटील म्हणाले की, शिर्डी मतदार संघात गावांच्या विकासासाठी आपण कधीही निधी कमी पडू दिला नाही. राजकीय मतभेद दूर सारून विकासाची ही प्रक्रीया सुरू असल्यानेच आपल्या मतदार संघातील ग्रामपंचायती आणि पंचायत समितीचा गौरव देशपातळीवर झाला आहे. यामध्ये ग्रामसेवक, स्थानिक पदाधिकारी यांचेही योगदान मोठे असल्याचे नमूद केले.</p><p>अध्यक्ष माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या निवडणुका या स्थानिक पातळीवरील असतात. त्यामुळे निवडणुकीचे निर्णय करण्याचे स्वातंत्र्य स्थानिक पदाधिकार्यांना दिले होते. निवडणुकीत जय पराजय हे होत असतात. निवडणुकीनंतर पुन्हा एक होऊन गावाच्या विकासाचा विचार करावा लागणार आहे. ग्रामपंचायतीमधूनच नेतृत्व करण्याची संधीही मिळत असते. ग्रामपंचायत ते लोकसभा ही लोकशाहीची साखळी असून त्याचे तुम्ही पाईक आहात, अशा शब्दांत त्यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा गौरव केला.</p><p>जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या की, पुरुषांच्या बरोबरीनेच महिलाही आता ग्रामीण भागात नेतृत्व करण्यासाठी पुढे आल्या आहेत. महिला सदस्या निवडून येतात पण कारभार पुरुष मंडळी पाहातात ही परिस्थिती आता बदलावी लागेल. गावात सक्षमपणे काम करण्यासाठी महिलांनी संघटीतपणे काम करुन विकासाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. </p><p>प्रास्ताविक डॉ.भास्करराव खर्डे पाटील यांनी केले. या कार्यक्रमास उपसभापती ओमेश जपे, बाळासाहेब जपे, जि.प सदस्या रोहीण निघुते, कविता लहारे, पं. स. सदस्या दिपाली डेंगळे, गुलाबराव सांगळे, कैलासराव तांबे, रामभाऊ भुसाळ यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.</p>.<div><blockquote>यावर्षीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या संख्येने तरुण आणि नवीन सदस्य निवडून आले आहेत. ग्रामीण विकासाच्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी या सर्व सदस्यांना मार्गदर्शनाची असलेली गरज लक्षात घेऊन रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या माध्यमातून सर्व नवनिर्वाचित सदस्यांना लवकरच प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आ. विखे पाटील यांनी सांगितले.</blockquote><span class="attribution"></span></div>