‘टाळे ठोको’ आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा - आ. विखे

आघाडी सरकारच्या विरोधात वीज ग्राहकांचा एल्गार
आ. राधाकृष्ण विखे पाटील
आ. राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय त्वरित मागे घ्यावा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने

शुक्रवार दि. 5 फेब्रुवारी 2021 रोजी वीज कंपनीच्या विरोधात पुकारलेल्या ‘टाळे ठोको’ आंदोलनात सर्व वीज ग्राहक आणि शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. राज्यातील 72 लाख वीज जोडण्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या जुलमी निर्णयाला विरोध करण्यासाठी आंदोलन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आ. विखे पाटील म्हणाले की, करोना काळात जनतेला वीज बिल माफीचे आश्वासन देणारे सरकार आता सक्तीने वीज बिल वसुली करून जनतेला नाहक त्रास देत आहे. थकीत बिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याची धमकी देणारे हे सरकार किती असंवेदनशील आहे हे यावरून दिसून येते. मात्र आम्ही या आघाडी सरकारला मनमानी कारभार करू देणार नाही.

भाजपाचे सर्व कार्यकर्ते, वीज ग्राहक शेतकरी रस्त्यावर उतरून शांततेत आंदोलन करतील. गावपातळीवर असलेल्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांना टाळे ठोकून, वीजपुरवठा खंडित करण्यास येणार्‍या महावितरणच्या कर्मचार्‍यांना अटकावही करतील, असा इशारा आ. विखे पाटील यांनी दिला.

मागील भाजप सरकारच्या काळात कधीच शेतकर्‍यांना वीज बिल भरण्याची सक्ती केली नाही. भारनियमनाचा त्रास सहन करावा लागला नाही. उलट वीज ग्राहकांना दिलासा देण्याची भूमिका घेतली गेली. थकबाकी वाढली तरी तो अर्थिक भार राज्य सरकारने स्वत:वर घेतला. कृषी क्षेत्रासाठी साडेसात लाख नवीन वीज जोडण्या दिल्या. वीज कंपन्यांची परिस्थिती सुध्दा चांगली होती. पण आघाडी सरकार सतेवर आल्यानंतर नेमकी वीज वितरण कंपन्यांची परिस्थिती बिघडली कशी? असा सवाल आ. विखे यांनी उपस्थित केला.

करोना काळात आवाजवी वीज बिल आल्यावर ती बिलं भरण्याची क्षमता सामान्य माणसाकडे नाही. विविध कारणांनी संकटात आलेला शेतकरीही वीज बिल भरण्याच्या मानसिकतेत नसल्याकडे लक्ष वेधून आ.विखे म्हणाले की, अवाजवी बिलं दुरुस्त करण्याची महाविकास आघाडी सरकारची घोषणाही कृतीत उतरली नाही.

यापुर्वी ग्राहकांना आलेल्या जादा रकमेच्या बीलांची होळी करून सरकारला इशारा दिला होता. याची आठवन करून देत, करोना प्रसारापूर्वी या सरकारच्या ऊर्जा मंत्र्यांनीच 100 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासनही प्रत्यक्षात आले नसल्यामुळे या आंदोलनाच्या माध्यमातून 100 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करणार असल्याचे आ. विखे पाटील म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com