कर्जत |वार्ताहर| Karjat
तालुक्यातील अनेक भागात शनिवारी रात्रभर झालेल्या अतिवृष्टी व वादळामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
या नुकसानीची पाहणी करून शेतकर्यांना धीर देण्यासाठी आ. रोहित पवार मतदारसंघातील नुकसानीची पाहणी केली. रात्रभर वादळी पावसामुळे शेतकर्यांच्या फळबागा, कांदा, मका, ऊस, तूर, कापूस, उदीड,नव्याने पेरणी झालेली ज्वारी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश आमदार रोहित पवार यांनी तहसीलदार, कृषी अधिकारी यांना दिले आहेत. तालुक्यातील आंबिजळगाव, कुळधरण, दुरगाव आदी ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात आ. रोहित पवारांनी पिकांची पहाणी केली.
शनिवारी रात्रभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जिकडे तिकडे पाण्याचे डोह साचले, अनेक शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. शेतीपिके पाण्यात बुडून गेली तर पावसाबरोबर वादळही असल्याने ऊस जमीनदोस्त झाले. परतीच्या पावसाने एकाच रात्रीत घातलेल्या थैमानाने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तहसीलदार नानासाहेब आगळे, मंडलाधिकारी संजय घालमे, राष्ट्रवादी युवकचे नितीन धांडे तसेच शेतकरी उपस्थित होते.