अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
अहिल्यादेवी होळकर यांनी देशात सर्वाधिक मंदिर, नद्यांवर घाट बांधले. त्यांचे कार्य हे व्यापक समाजहिताचे होते. त्यांच्या कार्याची माहिती पुढील पिढ्यांना होण्यासाठी चौंडीमध्ये संग्रहालय, वाड्याला घाट बांधणे, गावाला भव्य कमान उभारण्यासाठी साडे सात कोटींचा निधी मंजूर केला. या विकास कामांना आमदार प्रा. राम शिंदे यांनी स्थगिती आणली. त्यांना अहिल्यादेवी होळकर समजलेल्या नाहीत. त्यांच्या विचाराची पातळी उंच नाही. ते खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत आहेत, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.
खडी क्रेशर चालकांच्या अडचणी तसेच मतदार संघातील विविध विकास कामांच्या अनुषंगाने आमदार पवार हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यावेळेस पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आमदार पवार म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीचे राज्यात सरकार असताना चौंडीसाठी 35 कोटींचा निधी दिला. त्यानंतर प्रा. राम शिंदे हे आमदार आणि मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात एक रुपयाचेही काम या ठिकाणी झाले नाही. या ठिकाणी असलेल्या वाड्याला घाट असावा, अहिल्यादेवींचे कार्य नवीन पिढीला समजण्यासाठी संग्रहालय आणि गावाला भव्य वेस असण्यासाठी साडे सात कोटींचा निधी आपण मंजूर केला होता. आमदार प्रा. शिंदे यांनी या विकास कामांना स्थगिती आणली आहे. त्यांना अहिल्यादेवी समजल्या नाहीत. त्यांची विचारांचा पातळी उंच नाही. मोठ्या व्यक्तींना कंकण घालता येत नाही. आपण सर्वजण त्यांच्या विचारांचे सेवक आहोत.
आमदार शिंदे यांनी मिरजगाव, कोंभळी, खर्डा येथील पाणी योजना मंजूर झालेल्या असताना गेल्या चार महिन्यांपासून स्थगिती आणली आहे. केवळ एखाद्या मंत्र्याला आणून त्यांच्याहस्ते नारळ फोडण्यासाठी या कामांना खोडा घातला आहे. आपण मंजूर केलेल्या विकास कामांचे श्रेय ते लाटत आहेत, अशी टीका आ.पवार यांनी केली.