प्रत्येक लाभधारक तलावात वांबोरी चारीचे पाणी पोहोचणार

आ. तनपुरे || मुळा पाटबंधारे विभागाची बैठक
प्रत्येक लाभधारक तलावात वांबोरी चारीचे पाणी पोहोचणार

करंजी |प्रतिनिधी| Karanji

गेल्या तीन वर्षांपासून मुळा धरण ओव्हरफ्लो होताच पाथर्डी नगर सारख्या दुष्काळी तालुक्याला वांबोरी चारीद्वारे पाणी सोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करत असून योजनेतील सर्व लाभधारक तलावामध्ये पाणी पोहोचवण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

मुळाधरण ओव्हरफ्लो होण्यापूर्वीच आमदार तनपुरे यांनी मुळा पाटबंधारे विभागाची बैठक घेऊन सर्व तांत्रिक बाबी दूर करून वांबोरी चारीला पाणी सोडण्याचे नियोजन आखले असल्याचे सांगीतले. त्यामुळे जायकवाडीला ओव्हरफ्लोचे पाणी सुरू झाल्यानंतर लगेच वांबोरी चारी योजनेला देखील पाणी सोडण्याचे नियोजन केल्याने चार दिवसांपासून दोन पंपाद्वारे वांबोरी चारीला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

करंजी लाईनला सध्या पाणी सुरू केलेले असून सातवड पर्यंतच्या तलावात पाणी पोहोचले आहे. प्रत्येक तलावात पूर्ण दाबाने पाणी येत आहे का वांबोरी चारीच्या पाण्यासंदर्भात शेतकर्‍यांच्या काही अडचणी आहेत का? यासाठी आमदार तनपुरे यांनी रविवारी वांबोरी चारीच्या लाभधारक तलावावर जाऊन शेतकर्‍यांशी संवाद साधला. सध्या वांबोरी चारीला सोडण्यात आलेले पाणी बोनस म्हणून सोडण्यात आले असून हक्काचे 680 एमसीएफटी पाणी देणे शिल्लक आहे.

यावेळी माजी जि प अध्यक्ष बाबासाहेब भिटे, सरपंच अमोल वाघ, रवींद्र मुळे, विलास टेमकर, राजेंद्र पाठक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रफीक शेख, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष अंबादास डमाळे, शिवसेना तालुका संघटक राजेंद्र म्हस्के, चेअरमन संतोष गरुड, विजय पालवे, अशोक टेमकर, प्रतीक घोरपडे, देवेंद्र गीते, जालिंदर वामन, अजय पाठक, दत्तू कोरडे, सरपंच सुधाकर वांढेकर, चेअरमन श्रीकृष्ण वांढेकर, दिलीप वांढेकर, आबासाहेब अकोलकर,तुळशीदास शिंदे, सागर कराळे, नितीन लोमटे, सुनील पुंड, संजय लवांडे, सुनील लवांडे, सतीश क्षेत्रे, भरत शिंदे, शिवाजी शिंदे, मुळा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी एस. डी. कांबळे, कालवा निरीक्षक पी. एन. गरगडे, बी. डी. थोरात आदी उपस्थित होते.

पैसे मागितले तर खैर नाही

प्रत्येक लाभदायक तलावात पाणी पोहोचणार आहे. कोणीही पाईपलाईन अथवा एअरवॉलचा बिघाड करू नये. तसेच पाण्यासाठी कोणत्याही शासकीय अथवा खाजगी कर्मचार्‍यांने शेतकर्‍यांकडे पैशाची मागणी केली तर त्याची देखील गय केली जाणार नाही असा सूचक इशारा देखील आमदार तनपुरे यांनी यावेळी दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com