<p><strong>श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda</strong></p><p>डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणार्या श्रीगोंदा तालुक्यातील 59 व श्रीगोंदा विधानसभा मतदार संघातील नगर तालुक्यातील 22 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. </p>.<p>सदर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी आपली भावना आहे. बिनविरोध निवडणुका करणार्या श्रीगोंदा तालुक्यातील गावांना प्रत्येकी 10 लाखांचा विकास निधी आपण देणार असल्याची घोषणा माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी केली आहे.</p><p>यासंदर्भात आमदार पाचपुते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात निवडणुका बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, गेल्या 9 महिन्यांपासून आपल्या सर्वांवर करोनाचे संकट आहे. याचा सर्वांनाच त्रास सहन करावा लागला. शिवाय निवडणूक म्हटलं की गावात गटतट निर्माण होतात. </p><p>या राजकारणाचा गावाच्या विकास कामांवर विपरीत परिणाम होतो. वाद-विवाद टाळण्यासाठी, गावाच्या विकासासाठी व आर्थिक संकटात शासनाचे पैसे वाचविण्यासाठी गावांना विकासाची दिशा मिळावी. म्हणून गावकर्यांनी एकजुटीने उभे राहावे व या निवडणुका बिनविरोध कराव्यात.</p><p>बिनविरोध निवडणुका म्हणजे आदर्शगाव निर्माण करण्याची ही पायाभरणी ठरू शकते. पूर्ण गावाची एकी झाल्यास त्या गावाची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. श्रीगोंदा तालुक्यातील 59 व नगर तालुक्यातील 22 गावांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.</p><p>यातील जी गावे निवडणुका बिनविरोध करतील त्या गावाना प्रत्येकी 10 लाखांचा निधी आपण देणार आहोत. गाव-कारभार्यांनी गटतट बाजूला ठेवत गावाला दिशा देण्यासाठी निवडणुका बिनविरोध करून वेगळा आदर्श निर्माण करावा अशी भावना आ. पाचपुते यांनी व्यक्त केली आहे.</p>.<p><strong>करोनाग्रस्त असूनही ‘समाजकार्य’ सुरूच..</strong></p><p><em>नुकताच आमदार बबनराव पाचपुते यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. स्वतः वर करोनाचे उपचार सुरू असताना देखील आ. पाचपुते यांचे तालुक्यावर लक्ष आहे. तालुक्यातील लोकांशी ते फोनवरून संपर्क ठेवत त्यांच्या अडीअडचणी सोडवत आहेत. शिवाय काही दिवसांवर आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीबाबत त्यांनी बिनविरोध निवडणुका या उपक्रमास सुरुवात केली. करोनासारख्या आजाराने वेढले असतानाही आ. पाचपुते यांची ही सक्रियता चर्चेचा विषय ठरली आहे.</em></p>