<p><strong>कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav</strong></p><p>तालुक्यातील काही भागात रविवारी सोसाट्याच्या वार्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे व गारपीट झाल्यामुळे </p>.<p>काढणीला आलेल्या गहू, कांदा पिकांचे तसेच द्राक्ष, चिक्कू, डाळिंब, टरबूज आदी फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकर्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी नुकसानीचे अचूक पंचनामे करावेत, अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी कृषी विभागाला दिल्या आहे.</p><p>हवामान खात्याकडून मागील आठवड्यात 25 मार्चपर्यंत अवकाळी पाऊस व गारपीट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्या प्रमाणे कोपरगाव तालुक्यात रविवारी पावसामुळे तसेच काही ठिकाणी गारपीट झाल्यामुळे काढणीला आलेल्या गहू, कांदा पिकांचे तसेच द्राक्ष, चिक्कू, डाळिंब, टरबूज आदी फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. </p><p>झालेल्या नुकसानीबाबत आमदार आशुतोष काळे यांनी तहसील कार्यालय कोपरगाव येथे आढावा बैठक घेऊन शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. यावेळी कृषी विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा करताना ते बोलत होते. ते म्हणाले की, करोना संकटाची तमा न बाळगता शेतकर्यांनी मोठ्या कष्टातून रब्बी हंगामात गहू, कांदा पिकांचे शिवार फुलले होते व द्राक्ष, चिक्कू, डाळिंब, टरबूज आदी फळांचा काढणीचा हंगाम सुरू झाला होता. </p><p>नैसर्गिक संकटापुढे आपण हतबल असलो तरी या संकटातून नुकसानग्रस्त शेतकर्यांना उभारी देण्याचे आपल्या हातात आहे. मागील आठवड्यात ज्या शेतकर्यांचे अवकाळी पाऊस व झालेल्या गारपिटीमुळे नुकसान झाले आहे त्या शेतकर्यांच्या नुकसानीचे अचूक पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादर करावा. </p><p>शेतकर्यांचे वेळेत पंचनामे करून शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी पंचनामा करणार्या प्रशासनाच्या अधिकार्यांनी घ्यावी. पंचनामे करताना हलगर्जीपणा होणार नाही याची काळजी घ्यावी आदी सूचना देऊन मदत पुनर्वसन खात्याकडून नुकसानग्रस्त शेतकर्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी दिली. </p><p>यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन रोहमारे, अरुण चंद्रे, कोपरगाव जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, बाबुराव थोरात, नंदकिशोर औताडे, संदीप रोहमारे आदी उपस्थित होते.</p>