<p><strong>संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner</strong></p><p>मागील 9 महिन्यांपासून संपूर्ण मानव जातीवर करोनाचे मोठे संकट आले आहे. महाराष्ट्रात करोना रोखण्यासाठी </p>.<p>महाविकास आघाडी सरकारने चांगले काम केले असून या काळात नागरिकांचेही मोठे सहकार्य लाभले. मात्र लॉकडाऊनच्या शिथीलते नंतर व दिवाळी काळात खरेदीसाठी झालेली गर्दी ही मोठी चिंताजनक बाब आहे. करोना संकट अद्याप संपलेले नसून प्रत्येकाने स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबियांची काळजी घ्यावी, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.</p><p>करोनाबाबत नागरिकांना आवाहन करताना नामदार थोरात यांनी म्हटले आहे की, करोना हे मानव जातीवरील संकट आहे. मागील 9 महिन्यांपासून संपूर्ण जग करोनामुळे हतबल झाले आहे. महाराष्ट्रात करोना रोखण्यात सरकारला चांगले यश आले असून लॉकडाउनच्या शिथीलतेनंतर मात्र वाढणारी गर्दी हा चिंतेचा विषय ठरला आहे. </p><p>सणासुदीच्या काळात नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे व वाढणार्या थंडीमुळे करोना रुग्णांचा आलेख सध्या वाढतो आहे. युरोपियन राष्ट्रांमध्ये करोनाची दुसरी लाट आली असून अनेक देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. भारतात दिल्लीमध्येही करोनाची मोठी चिंताजनक परिस्थिती आहे.</p><p>स्वत:ला व स्वत:च्या कुटुंबियांना करोनापासून दूर ठेवण्याकरिता प्रत्येकाने शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टनचे पालन करावे. वेळोवेळी आपले हात स्वच्छ धुवावे. या त्रिसुत्रीचा वापर करोना रोखण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा आहे. </p><p>महाविकास आघाडी सरकारने माझे कुटुंब, माझी जबाबदारी या योजनेअंतर्गत केलेल्या आरोग्य सर्वेक्षणामुळे महाराष्ट्रात करोना रोखण्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र दिपावलीच्या काळात वाढलेली गर्दी पाहता करोनाच्या दुसर्या लाटेची शक्यता नाकारता येणार नाही, म्हणून विनाकारण घराबाहेर पडणे टाळा, कुठेही जास्त गर्दी करू नका, घरगुती समारंभ कमीत कमी उपस्थितीमध्ये करा किंवा घरगुती समारंभ टाळा, काही लक्षणे असल्यास तातडीने जवळच्या वैद्यकीय रुग्णालयांमध्ये तपासणी करून घ्या शासनाच्या नियमांचे पालन करा असे आवाहनही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.</p>