<p><strong>अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar</strong></p><p>विरोधकांवर टिका टिपण्णी करून राजकारण करण्याचे- दिवस गेले असून सध्या नागरिकांचे प्रश्न सोडवावेच लागतात, असे प्रतिपादन ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.</p> .<p>राज्यमंत्री तनपुरे यांच्या हस्ते नगर तालुक्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री तनपुरे यांनी माजी आमदार कर्डिले यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर टीका केली. इथून मागे झाले ते झाले. यापुढे विकास कामांच्या दर्जाबाबत कुठल्याही प्रकारची तडजोड करण्यात येणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. </p><p>नगर-औरंगाबाद महामार्ग ते पिंपळगाव उज्जैनी रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत संबंधित अभियंत्यावर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झालेला हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाला असून सुमारे सहा ते सात महिन्यांतच रस्त्यावर मोठ खड्डे पडले आहेत. </p><p>नविन वीज धोरणा नुसार शेतकर्यांना 60ते 70 टक्के वीजबिलात सवलत देण्यात आली आहे. शेतकर्यांनी योजनेचा फायदा घेऊन वीज बिल भरण्यास सहकार्य करावे. सद्यस्थितीत रोहित्र ओव्हरलोड असून त्याबाबत नवीन रोहित्र देण्यासाठी परिसराचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व शेतकर्यांना पूर्ण दाबाने वीज मिळेल, असा विश्वास मंत्री तनपुरे यांनी व्यक्त केला.</p>