बारागाव नांदूर |वार्ताहर| Baragav Nandur
गारपिटीमुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदतीसाठी प्रयत्न करू, असे आश्वासन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले.
नगर जिल्ह्यातील तीन तालुक्यात सायंकाळी गारपीट व वादळी वार्यासह अतिवृष्टी झाल्यामुळे नियोजित पाथर्डी दौरा रद्द करून नुकसानग्रस्त गावांची पाहणी ना. प्राजक्त तनपुरे यांनी केली. राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर, मल्हारवाडी, घोरपडवाडी, गाडकवाडी, म्हैसगाव, कोळेवाडी आणि इतर काही गावांमध्ये शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.
सर्व प्रमुख अधिकार्यांच्या उपस्थितीत शेतकर्यांच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी करत त्यांना दिलासा दिला. या नुकसानीचा तात्काळ प्राथमिक अहवाल बनविण्याचे आदेश अधिकार्यांना दिले आहेत. गारपीटग्रस्त भागातील शेतकर्यांना वीजबिल वसुलीत शिथिलता देण्यात येईल, असे स्पष्ट केले. माझ्या शेतकर्यांना या गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, यासाठी शासन दरबारी पूर्ण प्रयत्न केले जाईल, असे आश्वासन ना. तनपुरे यांनी दिले.
मुळा धरण परिसरातील गावांना गारपिटीने झोडपल्यानंतर शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. बारागाव नांदूर, कुरणवाडी, डिग्रस, बाभुळगाव, मल्हारवाडी, घोरपडवाडी, ताहाराबाद, म्हैसगाव, चिखलठाण पट्ट्यात मोठ्या प्रमाणात गारपिटीने शेतकर्यांचे नुकसान केले. तर संपूर्ण तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले.
याबाबत राज्यमंत्री तनपुरे यांनी मतदारसंघातील नुकसानग्रस्त शेतकर्यांची भेट घेत अधिकार्यांना नुकसानीचे कच्चे पंचनामे करून ठेवण्याचे आदेश दिले. याप्रसंगी तहसीलदार फसियोद्दीन शेख, मंडलाधिकारी सोनवणे, ग्रामविकास अधिकारी गोसावी उपस्थित होते. यावेळी नुकसान झालेल्या शेतकर्यांनी हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजीराजे पवार, प्रभाकर गाडे, श्रीराम गाडे, सरपंच निवृत्ती देशमुख, प्रदिप पवार, उपसरपंच प्रा. एजाज सय्यद, सेवा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब गाडे, सुनील पवार, विश्वास पवार, भाऊसाहेब कोहकडे, दूध संस्थेचे अध्यक्ष गोरक्षनाथ गाडे, नवाज देशमुख, डॉ. ज्ञानेश्वर आघाव, राजेंद्र गाडे, योगेश गाडे, यमनाजी आघाव, गोवर्धन गाडे, सोमनाथ पवार, कुरणवाडीचे सरपंच डव्हाण, दीपक गाडे, विजूनाना गाडे यांसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. कृषीसेवक पवार व ग्रामविकास अधिकारी गोसावी यांनी पंचनामे करण्यास प्रारंभ केला. कोतवाल संजय बाचकर व हरिभाऊ आघाव यांनी पंचनामे प्रक्रियेस सहकार्य केले.