संघटनेची ताकद हेच आपल्या यशाचे बलस्थान - ना. विखे

संघटनेची ताकद हेच आपल्या यशाचे बलस्थान - ना. विखे

आश्वी |वार्ताहर| Ashwi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशिर्वाद, जनता आणि कार्यकर्त्यांच्या भक्कम पाठबळामुळेच मिळालेल्या संधीतून जनतेच्या हिताचे निर्णय आपण करीत आहोत. परंतु आपल्या निर्णयाशी आणि परिसराच्या विकासाची असुया काहींना वाटत आहे त्यामुळेच चांगल्या कामात अडथळे निर्माण करण्याचे काम सुरू झाले आहे. यापुर्वी सुध्दा बाहेरुन आलेली आव्हानं परतवून लावण्याचे काम कार्यकर्त्यांनी संघटीतपणे केले आहे. संघटनेची ताकद हेच आपल्या यशाचे बलस्थान असल्याचे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

श्रीक्षेत्र निझर्णेश्वर येथे जनसेवा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ना. विखे पाटील यांनी संवाद साधला. नुकत्याच संपन्न झालेल्या प्रवरा सहकारी बँक, राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचीत पदाधिकारी आणि संचालकांच्या सत्कार याप्रसंगी करण्यात आला. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास प्रवरा बँकेचे नूतन चेअरमन डॉ. भास्करराव खर्डे, व्हा. चेअरमन मच्छिंद्र थेटे, राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, उपसभापती अण्णासाहेब कडू, डॉ. विखे पाटील कारखान्याचे व्हा.चेअरमन विश्वासराव कडू, बापूसाहेब गुळवे, कैलासराव कोते, कैलासराव तांबे, निवृत्त सनदी आधिकारी शिवाजीराव जोंधळे, भाऊसाहेब जेजूरकर, दीपक पठारे आदी उपस्थित होते.

ना. विखे पाटील म्हणाले, जनसेवा मंडळाच्या माध्यमातून खासदार स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी असंख्य कार्यकर्ते जोडले. विचारांवर आधारित कार्यकर्त्यांचे संघटन हेच आपल्या यशाचे बलस्थान आहे. एका विचाराने आणि समन्वयाने संघटनेची सुरू असलेली वाटचाल ही प्रवरा उद्योग समुहातील सर्व संस्थांच्या प्रगतीत आणि राजकीय यशामध्ये प्रतिबिंबीत होत असल्याचे त्यांनी नमुद केले. या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करताना विकास कामात आपण कुठेही मागे नाही, उलट प्रत्येक निवडणुकीत दिलेला शब्द पूर्ण करणे हेच आपले ध्येय असते. निळवंडे पाण्याच्या बाबतीत सुध्दा दिलेला शब्द पूर्ण करुन, वचनपूर्ती केली असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या भागातील युवकांसाठी रोजगार उपलब्ध करणे याचे नियोजन आता सुरू झाले आहे. यासाठी शेती महामंडळाच्या जमीनींचा उपयोग करण्यासाठी शासनाने आपल्याला परवानगी दिली आहे. या जमिनींवर औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांबरोबरच आयटी पार्क उभारण्याचा निर्णय झाला असून, प्रशासकीय स्तरावर याचे कामही सुरू झाले असल्याचे स्पष्ट करून त्यांनी सांगितले की, अनेक युवक आता प्रशासकीय सेवेत जाण्यासही इच्छुक आहेत. या युवकांना मोफत प्रशिक्षण देण्यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने नेहमीच पुढाकार घेतला आहे. पोलीस भरतीच्या प्रशिक्षणासाठी सुध्दा मोफत सुविधा संस्थेने उपलब्ध करुन दिल्याने त्याचा अनेकांना लाभ मिळाला आहे.

जनतेच्या हिताचे निर्णय महसूल विभागाच्या माध्यमातून होत आहेत. या विभागातून यापूर्वी जे निर्णय घेतले गेले नाहीत, ते निर्णय करुन सामान्य माणसाला दिलासा देण्याचे काम सुरू आहे.

याप्रसंगी माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, डॉ. भास्करराव खर्डे यांची भाषणे झाली. स्वागत संचालक कैलासराव तांबे यांनी केले तर आभार व्हा. चेअरमन विश्वासराव कडू यांनी मानले.

याच श्रीक्षेत्र निझर्णेश्वर येथे निळवंडे धरणाचे पाणी आणण्याचा शब्द मी लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना दिला होता, त्याची पुर्तता आता होत आहे. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी पुढाकार घेतल्यामुळेच आज लाभक्षेत्रात पाणी येऊ शकले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाच्या खर्चाकरिता प्रशासकीय मंजुर्‍या दिल्या. प्रकल्प मार्गी लागत असल्याचे समाधान आहे. कोणाला काय श्रेय घ्यायचे ते जरूर घ्यावे. आम्हाला आता आरोप-प्रत्यारोप आणि टीका टिपणी करण्यात कोणतेही स्वारस्य नाही. पाण्याचा प्रवाह कुठून येणार होता हे सर्वांनाच समजले आहे, असेही ना. विखे पाटील म्हणाले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com