
लोणी |प्रतिनिधी| Loni
पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव अहमदनगर जिल्ह्याला दिले तर ते भूषणावह ठरेल. त्यांचे कर्तृत्व फार मोठे आहे. याबाबत निर्णय झाला तर, निश्चितच आम्ही त्याचे स्वागत करु अशी प्रतिक्रीया पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, संभाजीनगर आणि धाराशीव नामांतराचे स्वप्न पूर्ण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संभाजीनगर आणि धाराशीव नामांतराबाबत दिलेले आश्वासन सरकारने पूर्ण केले असून, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रीया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ना.विखे पाटील म्हणाले की, नगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याच्या निर्णयाचे आपण स्वागत करणार आहोत.
माध्यमांशी बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर दोन्हीही जिल्ह्यांच्या नामांतराचा निर्णय करण्यात आला होता. या निर्णयाला आता दिलेल्या मान्यतेचे स्वागत करुन, याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आभारही मानले आहेत. शिंदे-फडणवीस सरकार हे दिलेले आश्वासनं पूर्ण करणारे सरकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ज्यांना 3 वर्षे सत्तेत राहील्या नंतरही शेवटच्या कॅबिनेटमध्ये या जिल्ह्याच्या नामांतराबाबत निर्णय घेण्याची बुध्दी सुचली त्या महाविकास आघाडी सरकारला या निर्णयाचे श्रेय घेण्याचा कोणताही आधिकार नाही. परंतू या नेत्यांना केले नसलेल्या कामांचे श्रेय घेण्याची सवय झाली आहे असा टोला लगावून जेव्हा औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहिली जात होती, त्या घटनेचे उदात्तीकरण करुन समर्थन कोणी दिले याचा खुलासा महाविकास आघाडीतील नेत्यांनी करायला हवा असे मंत्री विखे पाटील म्हणाले.
आघाडी सरकारच्या काळातच देवभक्ती आणि देशभक्ती दाखविणार्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जात होते याचा सोयीस्कर विसर महाविकास आघाडीच्या नेत्यांना पडला असून, जनता मात्र हे विसरणार नाही अशा शब्दात महाविकास आघाडीच्या नेत्यांवर मंत्री विखे पाटील यांनी टिका केली.