
संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
शाळेचे काम आटोपून घराकडे निघालेल्या शिक्षकांच्या मोटरसायकलला पिकअप धडक दिल्याने दोघे ठार झाल्याची घटना काल सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तालुक्यातील सायखिंडी फाट्याजवळ घडली.
या अपघातात अजय चंद्रभान नन्नवरे (वय 36, रा. सायखिंडी, ता. संगमनेर) व विलास रविंद्र ठोंबरे (वय 23, रा. शिवलवाडी, ता. मंचर) या दोघांचा मृत्यू झाला.
याबाबत समजलेली माहिती अशी की, अजय चंद्रभान नन्नवरे हे पुर्वी नाशिक तालुक्यातील कळवण येथे प्राथमिक शिक्षक होते. त्यांनी संगमनेर तालुक्यातील पिंपारणे येथे नुकतीच बदली करुन घेतली होती. काल आंदोलन झाल्यानंतर आज नन्नवरे हे आपल्या शाळेवर मित्रासोबत गेले होते. दोघेही शिक्षक असल्यामुळे एकाच गाडीवर गेले होते. शाळेचे काम आटोपल्यानंतर ते संगमनेर कडे येत होते. मित्राला घराकडे सोडल्यानंतर नन्नवरे हे सायखिंडी येथे चालले होते. ते सायखिंडी फाट्यावर असताना नाशिक येथून एक दुधाचा छोटा टँकर पुण्याकडे चालला होता. वाहनाचा इतका वेग होता की त्याने डिव्हायडर (दुभाजक) तोडून विरुद्ध बाजुने चाललेल्या नन्नवरे यांच्या गाडीला जोराची धडक दिली.
एम.एच 14 एच यु 0055 या क्रमांकाच्या टँकरने धडक दिली. या अपघातामध्ये दुधाचा टँकर तीन ते चार पलट्या खावून थेट शेजारी दहा ते पंधरा फुट खोल असणार्या खड्ड्यात जाऊन पडला. यात टँकरचा चालक विलास रविंद्र ठोंबरे याचा जागीच मृत्यू झाला.
संगमनेरात गेल्या आठ दिवसात सात जणांचा अपघाती मृत्यु झाल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपुर्वी संगमनेर तालुक्यातील चिखली येथे राहणारे ऋषीकेश उमाजी हासे (वय 20), सुयोग बाळासाहेब हासे (वय 21), निलेश बाळासाहेब सिनारे (वय 26) या तिघांना प्रभात दुधाच्या टँकरने धडक दिली होती. त्यात तिघे जागीच ठार झाले होते. तर संदिप कोरे हा जखमी झाला होता. त्यानंतर संगमनेर तालुक्यातील खराडी वाघापूर येथे राहणार पोलीस कर्मचारी गोरक्ष साहेबराव जाधव यांचा मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात झाला होता. त्यात ते मयत झाले होते. तर, आता अजय चंद्रभान नन्नवरे व विलास रविंद्र ठोंबरे यांचा अपघात होऊन दोघे जागीच ठार झाले आहेत. तर अन्य एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला आहे.