
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शहरात मुख्य बाजारपेठेसह उपनगरात रस्त्यावरील किती अतिक्रमणे आहेत, त्यांची यादी दोन दिवसांत सादर करा. तसेच शहरात मनपाचे किती गाळे आहेत, त्यांची सद्यस्थिती काय आहे, करार कधी संपले याची माहिती घेत नूतन आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी कामात सुसूत्रता यावी यासाठी नियोजन करून विविध उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले.
जावळे यांनी सर्व अधिकारी, विभाग प्रमुखांची बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त डॉ. श्रीनिवास कुरे, यशवंत डांगे, मुख्यलेखाधिकारी शैलेश मोरे, मुख्य लेखापरीक्षक विशाल पवार, सहाय्यक आयुक्त सचिन राऊत, सहाय्यक संचालक नगररचना राम चारठाणकर, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.
आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी कोर्ट विभागाकडे किती प्रकरणे प्रलंबीत आहेत, किती प्रकरणांचा निकाल मनपाच्या बाजूने लागला, किती नाही, त्याची कारणे तीन दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले. नगरसचिव विभागाकडे किती विषय प्रलंबीत आहेत, बांधकाम विभागाने किती वर्कऑर्डर काढल्या, त्यांची मुदत, प्रलंबनाची कारणे याबाबत अहवाल सादर करावे. घनकचरा विभागाने पुढील टेंडरची कार्यवाही सुरू करावी. करवसुली महत्त्वाची असून गाळेधारकांना त्वरीत नोटिसा बजावण्यात याव्यात,अशा सक्त सूचना त्यांनी केल्या.