
खरवंडी |वार्ताहर| Kharwandi
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार्या मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी तरुणाने बंधार्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना नेवासा तालुक्यातील खरवंडी येथे घडली.
अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज पाटील जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी खरवंडी येथील दत्तात्रेय अभिमन्यू भोगे (वय 45) यांनी गावातील साठवण बंधार्यात उडी घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येमागचे कारण त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत स्पष्ट केले.
शिंगणापूर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून पुढील कारवाईसाठी चिठ्ठी जप्त केली. सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे रजेवर असल्याने सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्याकडे तात्पुरता पदभार असल्याने त्यांनी खरवंडी येथील मयत दत्तात्रेय अभिमन्यू भोगे यांच्या घरी भेट दिली व दत्तात्रेय अभिमन्यू भोगे यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी ताब्यात घेतली.
चिठ्ठीतील मजकूर...
चिठ्ठीत दत्तात्रेय भोगे यांनी म्हटले की, मी जरांगे यांचे उपोषणास गेलो असता मला अभिमान वाटला. आपण मराठा समाजासाठी काहीतरी योगदान केले पाहिजे म्हणून जरांगे यांच्या उपोषणास पाठिंबा व आरक्षण मिळावे, आमचे मराठा बांधव सुखी व्हावेत म्हणून आरक्षण मिळण्यासाठी स्वदेह आत्मसमर्पण करून आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देत आहे.