
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मराठा आरक्षणासाठी जालना येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाला नगर जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी रस्ता रोको करीत पाठिंबा दिला. नगर-पुणे रस्त्यावरील कायनेटीक चौकात आंदोलकांनी ठिय्या मांडल्याने नगर, पुणे, बारामती व स्टेशन रस्त्याची वाहतूक ठप्प झाली. दरम्यान, या आंदोलनात बोलताना शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी, मराठा आरक्षणासाठी सरकारशी वेळप्रसंगी संघर्ष करू, पण मागे हटणार नाही, असा इशारा दिला.
जालना येथे मनोज जरांगे पाटील यांनी मागील 15 दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. गावोगावी विविध मार्गाने आंदोलने होत आहेत. नगर शहर व जिल्ह्यातही विविध संस्था व संघटनांनी निवेदने देत मराठा आरक्षण मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर, नगर जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी कायनेटीक चौकात तासभर रस्ता रोको आंदोलन केले. यात आ. संग्राम जगताप, मुख्यमंत्री शिंदे गटाच्या शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे शहराध्यक्ष व माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी नगरसेवक निखील वारे आदींसह अन्य उपस्थित होते. एक मराठा-लाख मराठाच्या घोषणा आंदोलनाच्यावेळी देण्यात आल्या.
यावेळी बोलताना आ. जगताप म्हणाले, मराठा आरक्षण चर्चेत आल्यावर त्याला राजकीय मंडळी विरोध करू लागली आहेत व हे नेहमीचे आहे. शिवाय आरक्षणाचा मुद्दा पुढे आल्यावर वातावरण निर्मिती होते, पण नंतर मुद्दा व मागणी मागे पडते. मात्र, आता हीच वेळ आहे आरक्षण मिळवण्याची. त्यामुळे सरकारशी वेळप्रसंगी संघर्ष करू, पण मागे हटणार नाही, असे स्पष्ट करून ते पुढे म्हणाले, मराठ्यांचा आता स्वराज्य हा एकच भगवा झेंडा असणार आहे व आपले यापुढे एकच नेतृत्व फक्त जरांगे पाटलांचे असणार आहे. त्यामुळे लाखोंच्या संख्येने त्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहनही आ. जगताप यांनी केले.
या आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाने महेश घावटे, परमेश्वर पाटील, ऋषिकेश सोमवंशी, कैलास वाघस्कर, सुरेखा सांगळे, निलेश म्हसेस गोरख दळवी, अमोल पवार, विवेक सुंबे, गिरीश भांबरे, सुरेश मिसाळ, राजेंद्र कर्डिले, गजेंद्र दांगट, संचित निकम आदींसह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
ओबीसीतून आरक्षण द्या
यावेळी मराठा क्रांती मोर्चाद्वारे नगर तालुक्याचे तहसीलदार संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले. यात मराठा समाजाला ओबीसीतून टिकणारे आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. या निवेदनात काही मागण्याही करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सर्व मराठ्यांना सरसगट ओबीसीमधून 50% च्या आतून कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यात यावे, महाराष्ट्रातील मराठा समाजातील आंदोलकांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत, ते विनाअट त्वरित मागे घेण्यात यावेत. जालना येथे आमच्या मायमाऊलींवर जो अमानूष लाठीचार्ज झाला, त्यातील दोषी अधिकार्यांवर कारवाई व्हावी व यापुढे असा निंदनीय प्रकार कधीही होऊ नये, अशा मागण्यांसह सरकारने जर आरक्षणविषयी योग्य पाऊल उचलले नाही तर 12 ऑक्टोबरनंतर जे काही होईल, त्यास सरकारच जबाबदार असेल. सरकारने आमच्या मागण्याचा जीआर लवकरात लवकर काढावा. नाहीतर यापुढे आंदोलने उग्र स्वरूपाची असतील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
मी पहिला आमदार
जालन्यात जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केल्यावर तेथे पोलिसांनी अमानूष लाठीमार केला. त्याचा त्याच वेळी मी रस्त्यावर उतरून निषेध केला होता. त्या लाठीमाराचा महाराष्ट्रात पहिल्यांदा निषेध करणारा मी आमदार आहे, असे स्पष्ट करून आ. जगताप म्हणाले, 40 वर्षांपासूनच्या या लढ्यात आता आणखी महिनाभर सरकारच्या निर्णयाची वाट पाहू, असे आवाहनही त्यांनी केले.