आरडगाव |वार्ताहर| Aradgav
मानोरी-वळण शिव रस्ता दोन्ही बाजूंनी वेड्या बाभळीच्या विळख्यात सापडल्याने व दोन्हीही बाजुच्या शेतकर्यांनी अतिक्रमण केल्यामुळे हा रस्ता वाहतूकसाठी जवळपास बंद झाला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या शिवरस्त्यावरील वेड्याबाभळी व झालेले अतिक्रमण काढून या रस्त्याचा श्वास खुला करावा, अशी मागणी लाभधारक शेतकरी व प्रवासी वर्गातून केली जात आहे.
अतिवृष्टीमुळे तालुक्याच्या पूर्व भागातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. त्यामध्ये मानोरी व वळण येथील शेतकर्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा मानोरी-वळण शिवरस्त्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूने साईड गटर नसल्याने पाणी रस्त्यावर वाहत आहे. अशा परिस्थितीत या रस्त्यावरून विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच शेती अवजारे शेती उपयोगी साहित्य शेतात नेणं हे तर मोठ जिकारीचे बनले आहे. या रस्ता अभावी परिसरातील अनेक शेतकर्यांचा ऊस देखील तोडी वना तसाच राहणार असल्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांचे उभे उस बाहेर कसे काढायचे? असा प्रश्न पुढे उभा आहे.
त्यामुळे या रस्त्याच्या समस्याकडे माजी राज्यमंत्री तथा आमदार प्राजक्त तनपुरे व तहसीलदार यांनी गांभीर्याने लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी हरिभाऊ आढाव, राजेंद्र आढाव, भाऊराव आढाव, भरता आढाव, गजानन देवकाते, महिंद्र आढाव, गणेश पिसाळ, दिनेश आढाव, सुभाष देवकाते, रावसाहेब आढाव, अशोक गायकवाड, बाबुराव मकासरे, अक्षय पिसाळ, बाळासाहेब खुळे, पोपट खुळे, एकनाथ आढाव, बाबा ठक्कर, अगस्ती मकासरे, भाऊसाहेब आढाव आदी लाभधारक शेतकरी व प्रवासी यांनी केली आहे.
राहुरी तालुक्यात अनेक कारखान्यांची उसतोडणी जोमात सुरू आहे. रस्त्या अभावी कारखानदार व ऊसतोडणी कामगार आमचा ऊस घेण्यास तयार नाही. शाळकरी मुलांनाही याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांना वारंवार मागणी करुनही अद्याप हे काम झालेले नाही.