
कर्जत |प्रतिनिधी| Karjat
70 टक्के मराठा समाज हा ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहे. यामुळे उर्वरित 30 टक्के मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा फायदा घेऊ द्या, यामध्ये ओबीसी समाजाची कोणतेही नुकसान होणार नाही, असे प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी कर्जत येथे आयोजित केलेल्या महासभेमध्ये बोलताना केले.
यावेळी जरांगे पाटील म्हणाले, आजपर्यंत मराठा समाजाने मोठा त्रास सहन केला. मात्र, आता हा त्रास सहन करणार नाही. आता बदल घडवायचा आहे. आरक्षण मिळविण्यासाठी लढा द्यायचा आहे. सरकारने एक महिन्यांचा वेळ मागितला. आम्ही 40 दिवस दिले. शेवटच्या टप्प्यात आरक्षण आले आहे. तोंडाजवळ घास आला आहे. मतभेद बाजूला ठेवा. आता ऐकलं पाहिजे. एकत्र आलं पाहिजे आणि ते मिळवलं पाहिजे, असे जरांगे पाटील म्हणाले. सध्या चार ही बाजूंनी मराठयांना घेरले आहे. पण एकत्र आलो असून आता सरकारला आरक्षण द्यावेच लागणार आहे. समाजासाठी एक व्हा. आपल्यासाठी पण पुढील पिढ्यासाठी आरक्षण गरजचे आहे. 24 तारखेला सरकारन वेळ मागितला आहे. जर 24 ला आरक्षण मिळालें नाही. तर त्यानंतरच आंदोलन सरकारला झेपणार नाही आणि पेलणार पण नाही.
मराठा जात संपविण्याचा विचार झाला असेल तर ती जात मिटवून द्यायची नाही. प्रत्येक घर पिंजून काढा. समाजाशी संवाद साधा. आरक्षण का गरजेचं आहे समाजाला पटवून सांगा. शांततेच युद्ध या सरकारला पेलणार आणि झेपणार नाही. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार घ्यायची नाही. आरक्षणासाठी 5 हजार पुरावे अभ्यासकांना सापडले आहेत. मग अडचण कुठे येतंय. आधार मिळाला आता मग कायदा पारित करा. मराठ्यांना सरसकट आरक्षण द्यायचं ते पण कायमस्वरूपी टिकणार. 1967 ला एका आधारावर आरक्षण दिलं. मग आम्हाला वेगळा न्याय का ? असा सवाल जरांगे पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.