
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
अन्न प्रशासन विभागाने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कारवाई करत कार्बाईड पावडरचा वापर करून पिकविलेले 51 हजार 500 रूपये किंमतीचे 622 किलो आंबे जप्त करून नष्ट केले आहेत. सर्व फळे व भाजीपाला विक्रेत्यांनी अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 अंतर्गत परवाना घेवुनच व्यवसाय करावा, अन्यथा कडक कारवाई करण्याचा इशारा सहायक आयुक्त संजय शिंदे यांनी दिला आहे.
7 जून, जागतिक अन्न सुरक्षा दिनाचे औचित्य साधून सहायक आयुक्त शिंदे, प्र. शा. काकडे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार, शरद पवार यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळे व भाजीपाला विभागाला भेट दिली. येथे ठोक आंबे विक्रेत्यांची तपासणी केली असता मे. जयमातादी फ्रुट कंपनी, भाजीपाला विभाग व मे. अब्दुल कादीर सिकंदर बागवान शॉप नं. 34, 35, 36 भाजीपाला विभाग यांच्याकडे विक्रीसाठी आलेल्या सलमान ऊर्फ अजमललाल महम्मद बागवान (रा. बलसाड, गुजरात) याच्या आंब्याची पथकाने तपासणी केली. आंबे पिकविण्यासाठी कार्बाईड पावडर सॅचेटस आढळून आली. पथकाने सदर आंब्याचा साठा जप्त करून महानगरपालिकेच्या घनकचरा विभागामार्फत बुरूडगाव कचरा डेपो येथे नष्ट केला आहे.