श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
पुरातन बारवांचे संवर्धन होण्यासाठी शिवदुर्ग ट्रेकर फाउंडेशनने महाराष्ट्र बारव मोहीम राबवत पुढाकार घेतला आहे. महाशिवरात्रीचे औचित्य साधत या सर्व बारवांची स्वच्छता करत रात्री अनोखा दिपोत्सव साजरा करण्यात आला. यामुळे चार तालुक्यांतील 21 बारव उजळून निघाल्या होत्या.
संपूर्ण महाराष्ट्रात एकाचवेळी 150 पेक्षा जास्त ठिकाणी बारवांवर हा उपक्रम पार पडला. श्रीगोंदा तालुक्यातील 17, कर्जत 1, नगर 1, व पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील 2 मिळून 21 बारवांवर दिपोत्सव साजरा करण्यात आला. तीस हजारपेक्षा जास्त दिवे लावण्यात आले.यासाठी 21 शिवदुर्ग टीम व 300 पेक्षाही जास्त शिवदुर्ग सदस्यांनी आणि गावोगावच्या हजारो ग्रामस्थांनी, तरुणांनी सहभाग नोंदवला.या दिपोत्सवाचा मध्यवर्ती सोहळा देऊळगाव गलांडे येथे पार पडला.
श्रीगोंदा पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, जळगावचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी उपस्थित राहून बारव पूजन व जलपूजन केले. उपस्थितांना मार्गदर्शन केले. या मोहिमेचे मुख्य प्रवर्तक रोहन काळे, मनोज सिनकर आदी यावेळी उपस्थित होते. आपणही या मोहिमेत सामील व्हावे ,असे आवाहन शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे यांनी केले.
अशा आहेत बारव
यामध्ये काशीबारव,(बेलवंडी कोठार,) बेलवंडी कोठार गाव- 2 देऊळगाव, बोरुडेवाडी (श्रीगोंदा), देवदैठण, घारगाव, कोळगाव, ढोरजा गाव,काशीविश्वनाथ मंदीर ढोरजा ,भानगाव, मांडवगण-4, चींभळे, कोसेगव्हाण-महादेव दरा. थेरगाव-कर्जत, कामरगाव नगर, कुरकुंभ, रोटी ता. दौंड येथे हा दिपोत्सव सोहळा पार पडला