अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
प्रेमविवाह केल्याच्या राग मनात धरून सासूरवाडीच्या लोकांनी तरूणाला मारहाण करत त्याच्यावर सत्तुरने वार केले. गणेश मारूती कासार (वय 26 रा. श्रीकृष्णनगर, कल्याण रोड, नगर) असे जखमी तरूणाचे नाव आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळी शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास कापडबाजारात ही घटना घडली. या प्रकरणी शनिवारी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जखमी गणेश कासार यांनी फिर्याद दिली आहे. वसंत मुरलीधर गोंधळी, राम मुरलीधर गोंधळी, सुरज वसंत गोंधळी, निशांत वसंत गोंधळी (सर्व रा. गोकुळवाडी, सर्जेपुरा) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. गणेश कासार यांनी वसंत गोंधळी यांच्या मुलीसोबत 20 जुलै, 2020 रोजी प्रेमविवाह केला होता. विवाह झाल्यापासून मुलीचे वडिल वसंत, चुलते राम व भाऊ सुरज, निशांत यांचा गणेशवर राग होता. त्यांनी वेळोवेळी गणेशला शिवीगाळ, मारहाण केली होती. तसे गुन्हे तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल आहे.
शुक्रवारी रात्री गणेश व त्यांचे मित्र गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यावेळी वसंत, राम, सुरज व निशांत हे तेथे आले.‘याने आपल्या घराची बरबादी केली आहे, याला सोडू नका’ असे म्हणत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. निशांतने हातातील सत्तुरने गणेशच्या पाठीवर तीन वार करून जखमी केले. ‘तुला जिवंत सोडणार नाही’, असे म्हणून ते तेथून निघून गेले असल्याचे गणेश यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.