रांजणगाव देशमुख (वार्ताहर)
कोपरगाव (Kopergoan) तालुक्यातील पोहेगाव (Pohegoan) परिसरात व रांजणगाव देशमुख (Ranjangoan Deshmukh) परिसरात विजेचा पूर्णपणे खेळखंडोबा झाला असून वीज वितरण कंपनी पूर्ण दाबाने वीजपुरवठा करत नाही. शेतकऱ्याबरोबरच घरगुती ग्राहकही विजेच्या लंपडावास वैतागले आहे. अपुऱ्या विजेवर घरातील उपकरणे चालत नसल्याने महिला वर्गालाही अडचणींनां तोंड द्यावे लागत आहे.
एक तर वीज नसतेच असली तर अतिशय कमी दाबाने असते. त्यामुळे ना घरातील फ्रिज चालते, ना मिक्सर चालते. सध्या प्रचंड ऊन वाढले आहे पण कमी दाबामुळे फॅनही चालत नाही. इनर्व्हटरही चार्ज होत नाही. आता पाणी कमी झाले आहे. विजेच्या वापर मध्यंतरीच्या काळपेक्षा कमी झाला आहे. वीज पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी अनेक वेळेस वीज वितरण कार्यालयात जाऊन विज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. मात्र विज वितरण कंपनी शेतकऱ्यांच्या व घरगुती विजग्राहकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे.
शहरांना पूर्ण दाबाने व ग्रामीण भागात कमी दाबाने वीज अशी भुमिका वीज वितरण कंपनीची आहे. शहरात माणसे राहातात मग ग्रामीण भागात जनावरे राहतात का असा सवाल महिला वर्गामधून विचारला जात आहे. काही ठिकाणी शेतात उभी असलेली पिके केवळ विजेअभावी जळून जात आहेत. रांजणगाव देशमुख परिसरात सातत्याने लंपडाव सुरू असतो. वीज असली तरी ती नसल्यातच जमा असते. शेतकरी अगोदरच मेटाकुटीस आलेला आहे. त्यात विजेचा लपंडाव. शेतकऱ्यांनी नेमके काय करावे. घरगुती वीज ग्राहकांनाही अतिशय कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. घरगुती वीजपुरवठा तातडीने सुरुळीत करावा, अशी मागणी परिसरातील महिला वर्गाने केली आहे.