
आरडगांव (वार्ताहर)
राहुरी तालुक्यातील मानोरी शिवारामध्ये गेल्या चार दिवसापासून बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे. मानोरी येथे भर दुपारीच मेंढीच्या कळपावर बिबट्याने हल्ला करून एक मेंढी फस्त केली तर एका शेतकऱ्याची शेळी देखील ठार केल्याची घटना घडली होती.
त्यातच आज भर दुपारी बिबट्याने देविदास आढाव या शेतकऱ्यांवर हल्ला चढविला. त्यामध्ये हे बालबाल बचावले आहेत. अशा घटनेकडे वन विभागाने मात्र सफशेल दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे परीसरात तात्काळ पिंजरा लावावा आणि शेतक-यांना दिलासा द्यावा अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.
मानोरी-गणपतवाडी शिवारामध्ये हा बिबट्या अनेकांस निदर्शनास पडत आहे. या ठिकाणी एक मादी बिबट्या, नर बिबट्या आणि दोन बिबट्याचे पिल्ले असल्याचे देखील शेतकऱ्यांनी सांगितले आहे. अनेक शेतकऱ्यांना या बिबट्याने दर्शन देखील दिले आहे. गणपतवाडी शिवारात काल भर दुपारी देविदास गंगाधर आढाव हे शेतकरी आपल्या शेतात चारा आणण्यासाठी गेले असता सदर शेतकऱ्याला हा बिबट्या दिसल्यानंतर हातातील विळा वर करत शेतक-यांनी आरडाओरड केला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तेथुन पळ काढल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
गेल्या आठ दिवसापासून या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार आ.हे वन विभागाने या ठिकाणी तात्काळ दखल घेऊन पिंजरा लावने क्रमप्राप्त होते. मात्र वन विभागाचे कुठलेही कर्मचारी अद्याप या परिसरात आले नसून घडलेल्या घटनेचा पंचनामा देखील केलेला नाही किंवा पिंजरा देखील लावला नसल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
वन विभागाने तात्काळ पिंजरा लावावा अन्यथा वन विभागाच्या विरोधात आंदोलन छेडले जाईल असा इशारा उत्तमराव आढाव, नानासाहेब आढाव, संपत थोरात, चंद्रभान आढाव, पोपट सोनवणे, आबासाहेब पोटे, एकनाथ थोरात, कारभारी थोरात, माधव आढाव, येथील शेतक-यांनी दिला आहे.