कोपरगाव |तालुका प्रतिनिधी|Kopargav
राज्यात दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यशासनाच्यावतीने ब्रेक द चेन मिशन अंतर्गत
करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अटी शर्ती घालून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद करण्यात आल्या असून संचारबंदी लागू केली आहे. असे असताना देखील नागरिक विनाकारण घराबाहेर फिरताना दिसत असल्याने नगरपालिका, आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाच्यावतीने शहरातील मुख्य रस्त्यावर अनावश्यक बाहेर पडणार्या नागरिकांची करोना रॅपिड अँटीजेन तपासणी करत दंडात्मक कारवाई केली .
कोपरगाव शहर, तालुक्यात सर्वत्रच करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शहरात संचारबंदीचा काळात विनाकारण फिरणार्यांची संख्या अधिक आहे. बंदच्या काळात अत्यावश्यक गोष्टींना सूट देण्यात आली आहे. त्याच गोष्टींचा गैरफायदा घेतला जात असल्याचे दिसून आले.त्यामुळे रिकामे फिरणार्या नागरिकांमध्ये करोनाचा फैलाव करणार्या नागरिकांना शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. रुग्ण संख्या व मृत्युचे प्रमाणही वाढले आहे. सर्व शासकिय यंत्रणा रात्रंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रयत्न करत आहे.
शासकिय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, डॉक्टर, सफाई कर्मचारी, अनेक घटक प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे खाजगी हॉस्पिटल, मेडिकल असोसिएशनही त्याच कामात आहेत. कोपरगावातील अनेक मेडिकल स्टोअर स्वतः प्रचंड गुंतवणूक करून करोना बाधितांना प्रामाणिकपणे औषधे, इंजेक्शने उपलब्ध करून देत आहेत. रात्रीअपरात्रीही पुरवठा करत आहेत. तरी देखील काही बेफीकीर नागरिक करोनाची भीती न बाळगता रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसत आहेत.
त्यांच्यावर शहर पोलीस व नगर पालिकेच्यावतीने दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, त्यांचे सर्व सहकारी तसेच पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे, सहाय्यक फौजदार बबन साठे, होमगार्ड बाळासाहेब धाकराव, श्रावण चव्हाण, रवींद्र खुडे, त्यांचे सर्व सहकारी लॅब टेक्निशियन भाऊसाहेब गायकवाड, आरोग्य कर्मचारी योगेश कोळी, शशिकांत बैसाने यांचा समावेश होता.
राज्यात संचार बंदी नियम लागू असताना काही नागरिक विनाकारण फिरताना दिसत असून पालिका व पोलिसांची पथके चौकाचौकांत तैनात आहेत.जे नागरिक वैद्यकीय कारणा व्यतिरिक्त बाहेर फिरताना दिसत असून त्यांची अँटीजेन टेस्ट करून त्यांची रवानगी कोव्हिड केअर सेंटरला केली जाणार आहे,कोणीही अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर फिरू नये अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
- प्रशांत सरोदे, मुख्याधिकारी