कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी 5 नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी 131.24 कोटी आणि शहराच्या विकासासाठी देखील 18 कोटी निधी दिला आहे. त्यामुळे विकासापासून दूर असलेलं कोपरगाव शहर विकासाच्या वाटेवर आले असल्याचे प्रतिपादन साईबाबा संस्थानचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी केले आहे.
ना. आशुतोष काळे म्हणाले की, अडीच वर्षापूर्वी कोपरगाव शहराची अवस्था काय होती. शहरातील रस्ते खड्डेमय झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. खराब रस्त्यांचा परिणाम शहरातील छोट्या मोठ्या व्यवसायांवर झाल्यामुळे व्यवसायिकांच्या चिंता वाढल्या होत्या. परंतु महाविकास आघाडी सरकारकडे केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यात मिळालेले यश आणि शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांसाठी निधी आणल्यामुळे आज शहराचा चेहरा नक्कीच बदलला आहे. शहरातील अमरधामची देखील मोठी दुरावस्था झाली होती.
अमरधामच्या दुरुस्तीसाठी देखील निधी दिला आहे त्यामुळे त्याठिकाणी सोयी सुविधा निर्माण होणार आहेत. विविध समाजाच्या सभामंडपासाठी देखील निधी दिल्यामुळे प्रत्येक समाजाला त्यांच्या हक्काची जागा मिळणार असून या सभामंडपात विविध कार्यक्रम घेण्यास त्या त्या समाजाची सोय होणार आहे. मात्र एवढ्यावरच थांबून चालणार नाही शहर विकासाचे अजूनही अनेक प्रश्न प्रलंबित आहे त्याचा देखील निपटारा होणे गरजेचे असून त्यासाठी नगरपालिकेची सत्ता देखील तेवढीच महत्वाची आहे.
त्यामुळे ज्याप्रमाणे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विश्वास दाखवला त्याची परतफेड शहराचा पाणी प्रश्न मार्गी लावून व शहरातील रस्त्यांना व शहर विकासाला कोट्यावधी रुपयांचा निधी देवून केली आहे. कोपरगाव शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी कसा आणायचा ही जबाबदारी माझी असून नगरपालिकेत एकहाती सत्ता द्यायची जबाबदारी तुमची आहे. अडीच वर्षात झालेला विकास पाहता ती जबाबदारी कोपरगाव शहरातील सुज्ञ नागरिक निश्चितपणे पार पाडतील, असा विश्वास ना. आशुतोष काळे यांनी यावेळी व्यक्त केला.