
कोपरगाव (प्रतिनिधी) - कोपरगाव मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी गेली पाच वर्षे आम्ही विविध प्रकारचा निधी आणून विकासकामे केली. जनहिताच्या कामांना प्राधान्य देत असताना शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्याच्या कामात आपण पडदयाआडून खोडा घालत होता. जनतेच्या जिव्हाळयाच्या प्रश्नात आपण राजकारण केले. गेली पाच वर्षे तुम्ही आडवे आलात. परंतु आम्ही तुमच्यासारखे निश्चितच वागणार नाही. असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.
शहराला वारंवार जाणवणारी पाणी टंचाई जाणवत असते. शहरवासीयांना बारा बारा दिवस पाणी येत नाही. त्यामुळे शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. शिर्डी येथे निळवंडे धरणातून येणारी पिण्याच्या पाण्याची पाईपलाइन आणण्याचे तत्कालीन सरकारने निष्चित केले. ही पाईपलाईन पुढे कोपरगाव पर्यंत आणण्यात यावी म्हणून विधानसभेत मंजुरी मिळवली. संस्थानच्या खर्चाने होणारी ही पाईपलाईन कामास मंजुरी मिळवून त्यासाठी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली.
वास्तविक निळवंडे धरणाच्या पिण्याच्या पाण्याच्या आरक्षण कोटयातुन हे पाणी कोपरगाव करांना मिळणार होते. शुद्ध व नियमित पाणी पुरवठा होउन शहरवासियांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार होता. परंतु सत्तेच्या हव्यासापायी आपण लाभक्षेत्रातील शेतकर्यांना न्यायालयात जाण्यास भाग पाडले. खोटया केसेस करायला लावुन आर्थीक रसद पुरविण्याचे काम केले. हे महापाप करून खाणेरडी राजनिती केली. मतदार संघात होणारी स्मार्ट सिटी राजकीय द्वेषापोटी दुसरीकडे घालविली. मतदार संघाच्या विकासासाठी कोटयावधीचा निधी आणून कामे करत असतांना स्वतःच्या राजकारणासाठी काही मतलबी लोकांच्या टोळीला हाताशी धरून माझेवर बिनबुडाचे आरोप करण्यात धन्यता मानली. नाटयगृहासाठी येवला रोड लगतची पाटबंधारे विभागाची सुमारे एक एकर जागा उपलब्ध केली. परंतु आम्ही मंजुर केलेले काम होउ नये म्हणून नाटयगृहाचे काम केले नाही.
ती रक्कम आपण दुसरीकडे वळविली. राजकारण बाजुला ठेवून विकासासाठी एकत्र या, अशी वल्गना आपण केली. याबाबत आम्ही निश्चितच समाधान व्यक्त करतो. परंतु गेल्या पाच वर्षात हे कृतीत आणले असते तर निळवंडेचे पाणी कोपरगाव करांपर्यत पोहचले असते. कोपरगावकरांची तहान भागली असती. पण आपण पदाच्या आणि खुर्चीच्या मोहापायी आपण या कामाला आडवे आले.
राजकीय अट्टाहासापायी तालुक्यातील स्मार्ट सिटी घालवून युवकांना रोजगारापासून वंचित ठेवले. नाटयगृहाचे काम प्रलंबित ठेवून नाटयरसिकांच्या तोंडाला पाने पुसली. आपल्या या कृत्यामुळे कोपरगावच्या जनतेची मात्र तहान भागली नाही. या निमित्ताने एवढेच सांगते, तुम्ही कोपरगावकरांना रोज शुद्ध पाणी दया, तुम्ही जसे गेली पाच वर्षे विकासकामात आडवे आले, तसे आम्ही निश्चितच आडवे येणार नाही.