<p><strong>अकोले |प्रतिनिधी| Akole</strong></p><p>केंद्र सरकारने केलेले कॉर्पोरेट धार्जिणे व शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा व शेतीमालाला आधार भावाचे कायदेशीर संरक्षण द्या, </p>.<p>या मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला निर्णायकरित्या आणखी व्यापक करण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने आज नाशिक ते मुंबई असा 15,000 शेतकर्यांचा भव्य राज्यव्यापी वाहन मोर्चा सुरू केला. नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथून नेताजी सुभाष चंद्र बोस जयंतीदिनी, दिनांक 23 जानेवारी रोजी सायंकाळी हा मार्च सुरू झाला.</p><p>त्यापूर्वी झालेल्या उत्साही जाहीर सभेस किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, जमसंच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे, माकपचे आमदार व सीटूचे राज्य सचिव विनोद निकोले, किसान सभेचे राज्य अध्यक्ष किसन गुजर, सरचिटणीस डॉ. अजित नवले, सहसचिव सुनील मालुसरे, डीवायएफआयच्या राज्य सरचिटणीस प्रीती शेखर आणि एसएफआयच्या राज्य उपाध्यक्ष कविता वरे यांनी संबोधित केले.</p><p>नाशिक येथून निघालेला हा वाहन मार्च (मोर्चा) आज इगतपुरीजवळ घाटनदेवी येथे रात्री मुक्कामी थांबेल. येथे राज्यातून जास्त शेतकरी सामील होतील. दि.24 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता घाटनदेवी येथून निघून हे हजारो शेतकरी कसारा घाट उतरून मुंबईच्या दिशेने कूच करतील.</p><p>दिल्लीतील शेतकरी आंदोलन तीव्र करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने देशभर दि. 23 ते 26 जानेवारी या काळात सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये राज्यपाल भवनांवर आंदोलन करण्याची हाक दिली आहे. मुंबई येथील आझाद मैदान येथे दि. 24 जानेवारी रोजी सुरू करण्यात येत असलेल्या महामुक्काम सत्याग्रहात सामील होण्यासाठी किसान सभेचा हा वाहन मोर्चा दि. 24 जानेवारी रोजी दुपारी सामील होईल.</p><p>दि. 25 जानेवारी रोजी आझाद मैदान येथे सकाळी 11 वाजता प्रचंड सभा होईल. महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि ना. आदित्य ठाकरे, डावे व लोकशाही पक्ष यांचे प्रमुख नेते आणि अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्व करणार्या संयुक्त किसान मोर्चाचे एक प्रमुख नेते माजी खासदार हनन मोल्ला या सभेस संबोधित करतील.</p><p>सभेनंतर येथे जमलेले हजारो श्रमिक दुपारी 2 वाजता राज भवनाकडे कूच करतील व प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यपालांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करतील.</p>