कर्जत | प्रतिनिधी
कर्जत (Karjat) तालुक्यातील पाटेवाडी येथील वीज उपकेंद्राला (Patewadi Power substation) पाटेवाडी, आनंदवाडी, निमगाव येथील संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी (Farmers) शुक्रवारी सायंकाळी टाळे ठोकले. विजेच्या अनियमिततेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन कर्मचाऱ्यांना घेराव घालत उपकेंद्रासमोर ठिय्या दिला.
पाटेवाडी, आनंदवाडी आणि निमगाव डाकु या तीन गावांसाठी महावितरणकडून शेतीपंपासाठी दिवसाआड आठ तास वीज दिली जाते. अशातही वीज केवळ पंधरा ते वीस मिनिटे चालते. वेळोवेळी खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी संतप्त झाले. शेतकऱ्यांनी संघटित होऊन पाटेवाडी उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांना घेराव घालत टाळे ठोकले.
वीज वेळेवर आणि उच्च दाबाने न मिळाल्याने शेतकऱ्यांनी शेतामध्ये जोपासलेली पिके तसेच जनावरांसाठी केलेला चारा जळून चालला आहे. वीज बिले वेळेवर भरूनही नियमित वीज पुरवठा होत नाही. हा शेतकऱ्यांवरचा अन्याय आहे, आम्हाला न्याय द्या.
विजेअभावी शेतामध्ये जळालेल्या पिकांचा तात्काळ पंचनामा करून त्याची नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी संतप्त शेतकर्यांनी केली. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले. सायंकाळी सात वाजता पोलीस आंदोलनस्थळी दाखल झाले.